देशात कोरोनाची तिसरी लाट अटळ, तयार राहा ; केंद्र सरकारच्या विज्ञान सल्लागारांचा इशारा

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । आता केंद्र सरकारच्या मुख्य वैद्यकीय सल्लागारांनी देशात कोरोनाची तिसरी लाट अटळ असल्याचा इशारा दिला आहे. दिल्लीत पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी देशातील सध्याची आणि भविष्यातील परिस्थितीविषयी माहिती दिली व  हा इशारा दिला.

 

देशभरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढू लागले आहेत.  आठवड्याभरापासून भारतात दिवसाला ३ लाखांच्या वर नवे  बाधित सापडत आहेत.  मृतांचा आकडा देखील सातत्याने ३५०० च्या वर राहिला आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण येऊ लागला असून अपुऱ्या ऑक्सिजनमुळे रुग्णांचे प्राण गेल्याचीही प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे आरोग्य व्यवस्था अजून सक्षम करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

 

केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांनी  पत्रकार परिषदेमध्ये यावर भाष्य केलं  “भारतात तिसरी लाट अटळ आहे. सध्याची रुग्णवाढ आणि वेगाने होणारा प्रसार पाहाता ते होणार आहे. पण ही तिसरी लाट कधी येईल आणि किती काळ असेल, हे सांगता येणं कठीण आहे. आपण या तिसऱ्या लाटेसाठी तयार राहायला हवं”, असं ते म्हणाले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये भारतात ३ लाख ८२ हजार ३१५ नवे बाधित सापडले असून ३ हजार ७८०  रुग्णांचा मृत्यू ओढवला आहे.

 

भारतात सध्या दिल्या जाणाऱ्या लसी  सध्याच्या स्ट्रेनवर परिणामकारक असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. कोरोनाचे नवे प्रकार जगभरात जसे आढळून येतील, तसेच ते भारतात देखील सापडणार आहेत, असं देखील त्यांनी स्पष्ट केलं. भारतात सध्या सीरम इन्स्टिट्युटने उत्पादित केलेली कोविशिल्ड आणि भारत बायोटेकने तयार केलेली कोवॅक्सिन या दोन लसींचे डोस दिले जात आहेत.

Protected Content