दुसऱ्या लाटेत तरुण कोरोना रुग्णांची संख्या वाढली !

 

मुंबई : वृत्तसंस्था । राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच आतापर्यंत संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक तरुण वर्गालाच कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात त्रासदायक ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

राज्यात ३० ते ४० वर्ष वयोगटातील रुग्ण सर्वाधिक, म्हणजे २१ टक्के  एवढे आहेत. त्यामुळे दुसरी लाट सुरू झाल्यानंतर आता तरुण वर्गाने सर्वाधिक खबरदारी घेण्याची गरज अधोरेखित होत आहे.

 

राज्याच्या आरोग्य विभागाने केलेल्या रुग्णसंख्येच्या विश्लेषणातून ही माहिती समोर आली आहे. राज्यात आढळलेल्या रुग्णांपैकी सर्वात कमी म्हणजे १.६९ टक्के  रुग्ण ८० वर्षांवरील वयोगटातील आहेत. १० वर्षांखालील मुलांना संसर्गाचे प्रमाण ३.४४ टक्के  एवढे आहे. ११ ते २० वर्ष वयोगटात हे प्रमाण काहीसे वाढले असून ६.६७ टक्के  रुग्ण या वयोगटातील आहेत. ७१ ते ८० वर्ष वयोगटातील ५.२९ टक्के  रुग्णांना कोरोना संसर्ग झाल्याचे आढळले आहे.

 

२१ ते ३० वर्षांदरम्यान १६.३३ टक्के  रुग्णांना करोना संसर्ग झाला.  सर्वाधिक रुग्णसंख्येचा वयोगट ३१ ते ४० वर्ष आहे. ४१ ते ५० वर्ष वयोगटात १८ टक्के  रुग्ण आहेत. ५१ ते ६० वर्ष वयाचे १६.२३ टक्के  रुग्णांना  संसर्ग झाला. ६१ ते ७० वर्ष वयाचे ११ टक्के  रुग्ण  बाधित झाले.

Protected Content