दिशा कायद्यासाठी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन-गृहमंत्र्यांची घोषणा

मुंबई प्रतिनिधी । आंध्रप्रदेशच्या धर्तीवर दिशा कायदा आणण्यासाठी विधिमंडळाच दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवण्यात येणार असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधान परिषदेत केली.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आंध्रप्रदेशचा दौरा करून दिशा कायद्याची माहिती अलीकडेच जाणून घेतली होती. यानंतर आता राज्यातही या प्रकारचा कायदा संमत करण्याचे नियोजन सुरू करण्यात आले आहे. महिला अत्याचारांना चाप लावण्याच्या दृष्टीनं, महिला सुरक्षा आणि सक्षमीकरणासंदर्भातला हा कायदा याच अधिवेशनात आणण्याचं सरकारचं नियोजन होते. तथापि, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुदतीपूर्वीच संस्थगित करावं लागत असल्यामुळे या कायद्याचं विधेयक या अधिवेशनात मांडणं शक्य नाही असं अनिल देशमुख यांनी आज सांगितले. यामुळे या कायद्यासाठी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घेण्यात येणार असून कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाल्यानंतर याला बोलावण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, हा कायदा करण्यापूर्वी बैठक घेऊन महिलांसाठी काम करणार्‍या सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींच्या सूचना जाणून घेतल्या जातील अशी माहितीदेखील अनिल देशमुख यांनी दिली.

Protected Content