‘थोडं काम आहे जावून येतो’ असं सांगत तरूणाने संपविली जीवनयात्रा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील समता नगरातील तरूणाने राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी ३१ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

विकास किसन गवळी (वय-२६) रा. समता नगर, जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे.

नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, विकास गवळी हा आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. हातमजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करीत होता. मंगळवारी ३१ जानेवारी रोजी दुपारी त्यांच्या घरातील एका लहान मुलाच्या जावूळ देण्याचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जळगाव शहरापासून २ किलोमिटर अंतरावर एक मंदीरात हा कार्यक्रम ठेवण्यात आला. त्यावेळी विकास गवळी देखील होती. दरम्यान, मला थोडं काम असल्याचे सांगून ते थेट समता नगरातील राहत्या घरी आला. त्याने राहत्या घरातच दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. दुपारी ३ वाजता विकासचे आईवडील घरी आल्यानंतर त्यांना हा लक्षात आला. मुलाने आत्महत्या केल्याचे पाहून त्यांनी हंबरडा फोडला. शेजारी राहणाऱ्या नागरीकांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. तपासणी अंती वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. त्यांच्या पश्चात आई, वडील आणि मोठा भाऊ असा परिवार आहे. याबाबत रामांनदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा प्रथमिक तपास पोहेकॉ प्रशांत पाठक करीत आहे.

Protected Content