‘ती’ गाडी काल संध्याकाळपर्यंत मुंबईतच होती; देवेंद्र फडणवीसांचं विधान

 

मुंबई : वृत्तसंस्था । देवेंद्र फडणवीस यांनी अंबांनींच्या घराबाहेर स्कॉर्पिओसोबत दिसलेली इनोव्हा कार मंगळवारी संध्याकाळपर्यंत मुंबईतच होती असा दावा केला आहे. 

उद्योगपती मुकेश अंबांनी यांच्या घराबाहेर स्फोटकांचा साठा सापडल्या   नंतर गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडल्यानंतर प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावरुन विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला केला असून अधिवेशनात घेरलं आहे. सर्वात प्रथम मनसुख हिरेन यांचा उल्लेख केल्यापासून ते मृत्यू झाल्याची माहितीदेखील फडणवीसांनीच समोर आणली होती. त्यानंतर आता फडणवीसांनी आणखी एक मोठं विधान केलं आहे. ते विधानसभेत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

सीसीटीव्हीत दिसणाऱ्या इनोव्हा कारसंबंधी आपल्याकडे काही माहिती आली आहे का? असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “माझ्या माहितीप्रमाणे एटीएसला ती गाडी कुठे आहे याची माहिती मिळाली आहे. मला वाटतं त्यासंबंधी ते कारवाई करतील. त्यांच्या माहितीआधी ती गाडी तिथून गायब झाली तर वेगळी गोष्ट आहे. पण त्यावर मी अधिकृतपणे काही बोलू शकत नाही कारण मी कोणत्याही तपासयंत्रणेचा व्यक्ती नाही. जी माहिती माझ्याकडे येते ती तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. पण माझ्या माहितीनुसार, काल संध्याकाळपर्यंत ही गाडी मुंबईतच होती”.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ गुरुवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी स्कॉर्पिओ कार बेवारस अवस्थेत सोडली होती. या कारमध्ये सुमारे अडीच किलो वजनाच्या जिलेटीनच्या कांड्या आढळून आल्यानं सगळ्यांनाच धक्का बसला होता. ‘मुंबई इंडियन्स’ लिहिलेल्या बॅगेत अंबानी कुटुंबीयांना धमकी देणारी चिठ्ठीही सापडली. या संपूर्ण प्रकरणात स्कॉर्पिओसह इनोव्हा कारही सहभागी होती. यापैकी स्कॉर्पियो कार १७ फेब्रुवारीच्या रात्री मुलुंड उड्डाणपुलाजवळून(ऐरोलीकडे जाणाऱ्या मार्गावरील) चोरण्यात आली. तर इनोव्हा कारवरील नोंदणी क्रमांक बनावट असल्याचं स्पष्ट झालं होतं. इनोव्हाची माहिती मिळवण्यासाठी पोलिसांकडून तब्बल ८०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं फुटेज तपासण्यात आलं. तसंच ३० हून अधिक जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.

Protected Content