नवी दिल्ली : वृत्तसंस्था । कृषी कायद्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली आहे.
या तिन्ही कायदामुळे देशातील शेतकऱ्यांची वाट लागणार आहे, असं सांगतानाच मी मोदी सरकारला घाबरत नाही. हे लोक मला हात लावू शकत नाहीत. पण मला गोळी घालू शकतात, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन कृषी कायद्याच्या मुद्द्यावरून भाजपवर घणाघाती टीका केली. तिन्ही कृषी कायदे शेतीची वाट लावणार आहेत. मी या कायद्यांचा विरोध करतो. आता मी भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या प्रश्नांची उत्तरेच देणार नाही. ते काही माझे प्राध्यापक नाहीत. मी केवळ शेतकरी आणि देशाच्या प्रश्नांची उत्तरे देईन, असं राहुल गांधी म्हणाले. मोदी सरकारने टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांची वाट लावण्यास घेतली आहे. ते केवळ तीन कायद्यांवर थांबणार नाहीत तर शेतकऱ्यांची वाट लावूनच थांबणार आहेत. संपूर्ण देशाची शेती आपल्या तीन चार मित्रांच्या हवाली करण्याचा त्यांचा डाव आहे, असा आरोप त्यांनी केला.
संपूर्ण देश विरोधात गेला तरी मी सत्याच्या बाजून लढत राहील. मी नरेंद्र मोदी किंवा भाजपला घाबरत नाही. मी स्वच्छ चारित्र्याचा आहे. हे लोक मला हात लावू शकत नाही. गोळी घालू शकतात ही दुसरी गोष्ट आहे. पण मी देशभक्त आहे. यांच्याविरोधात उभा राहणारच, असं त्यांनी सांगितलं. हे लोक शेतकऱ्यांना थकवू शकतात, पण त्यांना मूर्ख बनवू शकत नाहीत, असंही ते म्हणाले. काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांचा आंदोलनाचं सन्मानच करत आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांविरोधात कोणी बोललं तर त्याला देशद्रोही ठरवलं जातं. सत्ताधारी बोलताना कोणताही विचार करत नाहीत. संघाची त्यांना तशी शिकवणच आहे. मात्र, बोलण्यापूर्वी विचार करण्याची गरज आहे, असंही ते म्हणाले.
यावेळी राहुल गांधी यांनी चीनला वेळेतच धडा शिकवण्याची गरज असल्याचं स्पष्ट केलं. चीन भारताची कमजोरी पाहत आहे. चीनकडे स्ट्रॅटेजिक व्हिजन आहे. भारताकडे नेमका त्याचा अभाव आहे. डोकलाम आणि लडाखमध्ये घुसखोरी ही चीनची टेस्ट होती. त्यांच्या कारवायातून त्यांचा मेसेज समजून येतो. भारत काय करू शकतो हे त्यांना पाहायचे होते. त्यामुळे चीनची नांगी ठेचली पाहिजे. मग मिलिट्री स्ट्रॅटेजीने किंवा इकनॉमिक किंवा जीओ पॉलिटिक्स स्ट्रॅटेजीने चीनला धडा शिकवलाच पाहिजे, असंही ते म्हणाले.