तरूणावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या संशयितास अटक

जळगाव प्रतिनिधी । शेतातील नुकसान झाल्याच्या कारणावरून शेतकऱ्यावर विळ्याने वार करून जखमी करणाऱ्या संशयित आरोपीला रामानंद नगर पोलीसांनी अटक केली असून दुसरा संशयित फरार झाला आहे.

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, पिंप्राळा शिवारात जितेंद्र कोळी यांचे शेत आहे. या शेतात काही दिवसांपूर्वी संशयित सुपडू चंद्रकात ठाकरे वय 27 रा. पिंप्राळा मढी चौक याच्या मालकीचे घोडे चरायला आले होते. त्यामुळे पिकांचेही नुकसान झाले होते. याबाबत जितेंद्र कोळी हे 18 जानेवारी रोजी सुपडू ठाकरे याच्याकडे गेले. त्यांनी तुझे घोडे शेतात चरून पिकांचे नुकसान करत असल्याचे सांगितले. तसेच यापुढे असे व्हायला नको असेही कोळी म्हणाले. याचा राग आल्याने ठाकरे याच्यासह मिलिंद मितेश जाधव या दोघांनी जितेंद्र कोळी याच्यावर विळ्याने वार केले होते. याप्रकरणी जखमी जितेंद्र कोळी यांनी दिलेल्या जबाबावरुन सुपडू चंदक्रांत ठाकरे व मितेश मिलिंद जाधव याच्याविरोधात रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान यातील संशयित सुपडू ठाकरे याच्याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक रविंद्र पाटील यांना माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी शिवाजी धुमाळ, विजय खैरे, उमेश पवार, रविंद्र चौधरी या पथकासह संशयित ठाकरे यास अटक केली. त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास 25 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यात मिलिंद जाधव हा फरार असून त्याचाही पोलीस शोध घेत आहेत.

Protected Content