जिल्ह्यात ७ मार्चपर्यंत जमावबंदीचे आदेश; नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणार

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अपर जिल्हादंडाधिकारी राहुल पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

या कालावधीत शस्त्र, सोटे, भाले, तलवार, बंदुका, सुरे, लाठया व काठया किंवा शारीरिक दुखपती करण्यासाठी वापरात येतील, अशी कोणतीही हत्यारे अथवा वस्तु घेऊन फिरणे, अंग भाजून टाकणारा कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ किंवा द्रव्ये बरोबर घेऊन फिरणे, दगड अगर इ. अस्त्रे किंवा शस्त्रे सोडावयाची अगर फेकावयाची हत्यारे, साधने इ. तयार, जमा करणे, आणि बरोबर नेणे, कोणत्याही इसमाच्या चित्रांचे प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांच्या चित्रांचे प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे, सार्वजनिकरित्या ओरडणे किंवा विक्षिप्तपणे हावभाव करणे, सभ्यता अगर नितीमत्ता विरुध्द असतील अशी किंवा शांतता धोक्यात आणतील अशी भाषणे, हावभाव करणे, सोंग आणणे आणि तशी चिन्हे, चित्रे, फलक लावणे किंवा इतर कोणतेही असे जिन्नस अगर वस्तु तयार करणे अगर त्यांचा प्रसार करणे या कृत्यांना बंदी घालीत आहे.

वरील कलम 37 (1) अंतर्गतचा हा आदेश ज्यांना हातात लाठी किंवा तत्सम वस्तु घेतल्याशिवाय चालता येत नाही अशा वृध्द अथवा अपंग इसमांना लागु असणार नाही. या कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास स्थानिक पोलीस स्टेशन यांच्या कार्यालयाची पूर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश लग्न मिरवणुका, धार्मिक मिरवणुका, प्रेतयात्रा यांना लागू राहणार नाही. असे अपर जिल्हादंडाधिकारी राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Protected Content