जामनेर शहरातील चोरी प्रकरणातील दोन आरोपींना अटक

जामनेर (प्रतिनिधी):– जामनेर शहरातील गिरीजा कॉलनी भागातील भरवस्तीत राहणार्‍या वृध्द दाम्पत्याला धमकावून जवळपास साडेआठ लाखांचा ऐवज लांबविणार्‍या दोघा चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत माहिती अशी की गिरीजा कॉलनीतील रहिवासी बळीराम जयराम माळी(वय-७५) यांच्या घरात दि.८ रोजी पहाटे ३ वाजेच्या दरम्यान घराच्या मागील बाजूने घरात घुसून चोरट्यांनी वृद्ध दाम्पत्याला मारहाण करत व बळीराम माळी यांना एका चोरट्याने गळ्याला गळफास लावत ८ लाख ५० हजार रोख,१० हजाराचे सोन्याचे बिस्कीट,व ५००रु.किमतीची लोखंडी पेटी असा सुमारे ८,६०,५०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची तक्रार दाखल केली होती. त्या चोरीचा तपास लावण्यात स्थानीक गुन्हे शाखेला अखेर यश येऊन चोरीतील २ लाख ३३ हजाराची रोकड तर ६९ ग्रॅम सोने (बाजारभाव किंमत सुमारे सव्वातीन लाख) असा एकुण पाचलाख अठ्ठावन्न हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेऊन दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर अन्य दोघे फरार आहेत.

चोरी झाल्यापासुनच स्थानीक गुन्हे शाखेकडुन व स्थानीक पोलीसांनी गुप्तपणे तपास सुरूच ठेवला होता.अखेर आज मिळालेल्या गोपनीय माहितीवरून शहरातील गांधी चौकात सापळा रचुन सय्यद मुयोदीन सय्यद मुकमोद्दीन (रा. चाळीस मोहल्ला जुना बोदवड रोड जामनेर) व आकाश (उर्फ चँम्पीयन) श्याम इंगळे (रा.आठवडे बाजार तालुका पोलीस स्टेशन जवळ भुसावळ) अशा दोघा आरोपींना अटक करण्यात आली तर अन्य दोन आरोपी वसीम अहमद पिंजारी,जितु (पुर्ण नाव नाही) दोघे रा. भुसावळ हे फरार आहेत. यावेळी पथकामधे सहायक फौजदार अशोक महाजन, गोपनीय शाखेचे विजय पाटील,हे.कॉ सुनील दामोदरे, रवींद्र घुगे,नंदलाल पाटील,भगवान पाटील आदी होते.

Protected Content