जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील शेतरस्त्यांच्या कामांना प्रारंभ झाला असून पहिल्या टप्प्यात १७ कामे करण्यात येणार आहे.
राज्य शासनाने पाणंद रस्ते योजनेच्या अंतर्गत प्रथम शिवरस्ते, नकाशावर असलेल्या रस्त्यांवर झालेले अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतला व अध्यादेश काढून तो अंमलात आणला. या योजनेत जामनेर तालुक्यातून ४० पेक्षा अधिक रस्त्यांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. त्यास टप्प्याटप्प्याने प्रशासकीय व तांत्रिक मान्यता दिली जात आहे. पहिल्या टप्प्यात मंजूर झालेल्या खडकी, शेंदुर्णी, फत्तेपूर, सामरोद, सावरला या गावांतील रस्त्यांना मंजूरी मिळाली आहे. या कामांना आता प्रारंभ करण्यात आला आहे. तहसीलदार नामदेव टिळेकर यांच्या उपस्थिीती खडकी येथे स्वत: उभे राहून रस्त्याचे मोजमाप करून वापरात असलेल्या रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूला समान अंतर घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली.