पीएम किसान योजना शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी

चाळीसगाव, प्रतिनिधी | तालुक्यात महसूल विभागाने गेल्या अनेक दिवसांपासून प्रधानमंत्री किसान सन्मान  योजनेचे काम बंद केले आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग होणेही आता बंद झाले आहे. त्यामुळे महसूल व कृषी विभागाने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्यामुळे शेतकरी हा हवालदिल झाला आहे.

 

देशातील शेतकरी हा नेहमीच आर्थिक कचाट्यात सापडलेला असतो. त्यामुळे  शेतकऱ्यांना आर्थिक व मानसिक हातभार लागावा या दृष्टीकोनातून पंतप्रधान नरेंद मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान  योजनेला सुरुवात केली. या योजनेमुळे अनेक शेतकऱ्याचे जीवनमान सुधारले. कोरोनाच्या पहिल्या लाटेत हि योजना शेतकऱ्यांना खरंच वरदान ठरली. मात्र तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणारे दोन हजार रुपये अचानक बंद झाले आहे. तत्पूर्वी चाळीसगाव येथील महसूल विभागाने गेल्या काही महिन्यापासून पीएम किसान योजनेच्या कामाला अचानक ब्रेक लावले आहेत. यामुळे शेतकऱ्याचे अक्षरश: हाल झाले आहे. दररोज तालुक्यातील हजारो शेतकरी तक्रारची समस्या घेऊन महसूल विभागात येतात. परंतु हे काम आमचे नसून कृषी विभागाचे आहे. त्यामुळे तुम्ही त्याठिकाणी जा असे सांगून टाळाटाळ केली जाते. त्यावर शेतकरी हा कृषी विभागाच्या पायऱ्या चढला की, हे काम महसुलाचे आहे. तेच आपली तक्रार निवारण करतील असे त्यांच्याकडूनही सांगण्यात येते. यामुळे दोन्ही कार्यालयाच्या हजारो चकरा मारून मारून शेतकरी त्रस्त झाला आहे. आतातरी आमच्या समस्या कोणीतरी सोडवाव्या यासाठी शेतकरी दररोज फेरफटका मारत असतो. या गंभीर समस्यांकडे कोणाचेही लक्ष नाही. त्यामुळे महसूल व कृषी विभागाने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. अगोदरच कोरोनाची झळ अध्यापपर्यंत  सर्व सामान्य शेतकऱ्यांना बसत आहे. त्यात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या  माध्यमातून मिळणारे आर्थिक सहाय्य तांत्रिक अडचणीमुळे बंद झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

Protected Content