जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरात विविध समस्यांसह घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. नागरिकांना मूलभूत सुविधासह इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी स्थानिक रहिवाशी यांनी बुधवारी २१ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता महापालिकेवर मोर्चा काढून विविध मागण्यांचे निवेदन महापौर जयश्री महाजन यांना देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव शहरातील प्रभाग क्रमांक १ मधील केंद्रालाल मिल परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून कचरा, गटार, साफसफाई याची अत्यंत गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या परिसरात राहणारे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या परिसरात स्वच्छता व्हावी या संदर्भात जळगाव महापालिकेला वारंवार निवेदन व विनंती अर्ज देखील करण्यात आले, परंतु याकडे जळगाव महानगरपालिका प्रशासनाचे साफ दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे महापालिकेने याकडे गंभीर्याने लक्ष देऊन परिसरातील कचरा, गटार, साफसफाई तातडीने करण्यात यावी, तसेच या परिसरातील रस्त्यावरील लाईट दुरूस्त करण्यात यावी, यासह इतर मागण्या केल्या आहे. या मागण्यांचे निवेदन महापौर जयश्री महाजन यांना देण्यात आले आहे.
या निवेदनावर नगरसेविका रुकसानाबी गबलू खान, अश्फाक शेख अमजद खान, शेख महंमद, इम्रान बागवान, करण पवार, नारायण सपकाळे, सलमान शहा, किरण कासट, शबीनाबी शेख, अकिल शेख, हमीदाबी जमील शेख यांच्या स्थानिक रहिवासी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.