गारखेडा येथे लवकरच पर्यटनस्थळ येणार पर्यटकांच्या सेवेत !

जामनेर, प्रतिनिधी| तालुक्यातील गारखेडा परिसरातील जुन्या गावाच्या जागेवर वाघूर धरणात असलेल्या बेटावर पर्यटनस्थळाचे काम पूर्ण झाले असून येत्या महिन्याभरात पर्यटकांसाठी सुरू होणार आहे.

आमदार गिरीश महाजन हे जलसंपदा मंत्री असताना सन: २०१९ मध्ये महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट डिपार्टमेंट अंतर्गत वाघूर धरणाच्या बॅक वॉटर मध्ये असलेल्या बेटवर पर्यटनस्थळाला मंजुरी मिळवून दिली होती. या कामासाठी तीन कोटी ६२ लाख रुपये निधी उपलब्ध झाल्याने प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्यात आली होती. गारखेडा या गावापासून काही अंतरावर जुन्या गावाच्या जागेवर वाघूर धरणाच्या बेटच्या परिसरात या पर्यटन स्थळाचे काम सुरू असून ते अंतिम टप्प्यात आहे. येत्या महिन्याभरात पर्यटकांसाठी पर्यटनस्थळ हे सुरू करण्यात येणार आहे. दरम्यान कामाची पाहणी माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन व बांधकाम विभाग अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांनी लवकर काम आटोपून पर्यटन स्थळ सेवेत रुजू करण्याचे सुचना केली.

या ठिकाणी पर्यटकांसाठी बांबू हाऊस उभारण्यात येणार असून पर्यटकांसाठी तीन व चार बेड असलेली हाऊस बोट सुद्धा उपलब्ध राहणार आहे. यामुळे पर्यटकांना या ठिकाणी दोन-तीन दिवस राहता येणार आहे. पर्यटकांना पर्यटनस्थळाचा आनंद घेता येणार आहे. पर्यटनस्थळ सुरू झाल्यानंतर परिसरातील नागरिकांना उपजीविकेचे साधन उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यात कोणत्याच ठिकाणी नसेल असा पर्यटनस्थळ उदयास येणार आहे. १५ नोव्हेंबर पर्यंत पर्यटन स्थळ सुरू होणार असल्याची माहिती अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांनी दिली आहे. यावेळी सेवानिवृत्त अभियंता जे.के. चव्हाण , सरपंच शालिक पवार, जगदीश पाटील, हुला महाजन, अशोक पाटील आदी उपस्थित होते.

Protected Content