कोरोना लसीमुळे मृत्यूची देशात पहिली नोंद

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । देशात कोरोना लस दिल्यानंतर झालेल्या पहिल्या मृत्यूची खात्री पटली आहे.

 

लशीमुळे एका ६८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. केंद्र सरकारने गठित केलेल्या पॅनेलच्या अहवालात ही बाब समोर आली आहे. लसीकरणानंतर गंभीर आजार किंवा मृत्यू झाल्यास याला वैज्ञानिक भाषेत अ‍ॅडवर्स इव्हेंट फॉलोइंग इम्यूनिझेशन (AEFI) म्हणतात. केंद्र सरकारने AEFI साठी समिती गठीत केली आहे.

 

या समितीने लसीनंतर ३१ मृत्यूंचे आकलन केल्यानंतर, लस घेतल्यानंतर अ‍ॅनाफिलेक्सिसमुळे ६८ वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली. ही एक प्रकारची अ‍ॅलर्जी आहे. वृद्धाला लशीचा पहिला डोस ८ मार्चरोजी मिळाला होता आणि काही दिवसांनी त्याचा मृत्यू झाला.

 

AEFI समितीचे चेअरमन डॉ. एन के अरोरा यांनी लशीमुळे पहिल्या मृत्यूची पुष्टी केली आहे. परंतु, पुढे त्यांनी काही बोलण्यास नकार दिला

 

आणखी तीन मृत्यू लशीमुळे झाल्याचे मानले जात आहे. परंतु अद्याप याची पुष्टी होणे बाकी आहे. सरकारी समितीच्या अहवालात असे म्हटले आहे की, “आता लशीशी संबंधित ज्या प्रतिक्रिया येत आहेत, त्याची अपेक्षा आधीचं होती, जी सध्याच्या वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे लसीकरणास जबाबदार ठरू शकते. या प्रतिक्रिया अ‍ॅनाफिलेक्सिससारखे असू शकतात.”

 

संबंधित अहवालात सांगितले गेले की, अ‍ॅनाफिलेक्सिसचे दोन प्रकरण आणखी समोर आले होते. या दोन लोकांना १६ जानेवारी आणि १९ जानेवारी रोजी लस दिली होती. हे दोघे होते. यामध्ये एक २२ वर्षांचा आणि एक २१ वर्षांचा होता. या दोघांना वेगवेगळी लस देण्यात आली होती. रुग्णालयात भरती केल्यानंतर दोघे बरे झाले.

 

डॉ. एनके अरोरा सांगतात, “हजारमध्ये एकाला ही अ‍ॅलर्जी होते. लसीकरणानंतर अ‍ॅनाफिलेक्सिसची लक्षणे दिसल्यास त्वरित उपचार आवश्यक आहेत. ३० हजार ते ५० हजारांपैकी एकाला अ‍ॅनाफिलेक्सिस किंवा तीव्र अ‍ॅलर्जीची लक्षणे दिसतात, हे लक्षणे दिसल्यास त्वरीत उपचार घ्यावे.”

 

 

Protected Content