मुंबई (वृत्तसंस्था) गृहमंत्री अनिल देशमुख हे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन कोरेगाव-भीमा हिंसाचार आणि एल्गार परिषद प्रकरणी एसआयटी (विशेष तपास पथक) स्थापन करतील, अशी माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.
‘एसआयटी’ स्थापन करण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादीने प्रयत्न सुरु केले आहेत. मुंबईत पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी बोलावलेल्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या बैठकीत यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. या बैठकीत शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांशी चर्चा केली. एसआयटी स्थापन करण्याबाबत शरद पवारांनी राज्य सरकारला पत्र दिले होते. राज्य सरकार एल्गार परिषदेसंदर्भात समांतर एसआयटी स्थापन करु शकते, एनआयए (राष्ट्रीय तपास यंत्रणा) च्या कलम 10 नुसार वेगळी समिती स्थापन करण्याची तरतूद आहे, असे मलिक यांनी स्पष्ट केले.