रायसेन: वृत्तसंस्था । मध्य प्रदेशातील रायसेन येथील शेतकरी संमेलनाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किमान आधारभूत किंमत बंद होणार नाही’ असे सांगत पुन्हा एकदा केंद्रीय कृषी कायद्यांचे समर्थन केले आहे.
केंद्रीय कृषी कायदे हे एका रात्रीत आलेले कायदे नाहीत, गेल्या २० ते २२ वर्षांमध्ये आलेल्या प्रत्येक सरकारने त्यावर व्यापक चर्चा केलेली आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून देशात शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या कायद्यांवर बरीच चर्चा झालेली असल्याचेही मोदी म्हणाले. गेल्या २०-२२ वर्षांपासून प्रत्येक सरकारने यावर व्यापक चर्चा केली आहे. जवळ-जवळ सर्वच संघटनांनी या कायद्यांवर चर्चा केल्याचेही ते पुढे म्हणाले.
मोदी पुढे म्हणाले की, शेतकरी, शेतकऱ्यांच्या संघटना, कृषीतज्ज्ञ, कृषी अर्थतज्ज्ञ, कृषी वैज्ञानिक, आमच्याकडील सुधारणावादी शेतकरी सतत कृषी क्षेत्रात सुधारणा करण्याची मागणी करत आहेत. ज्या पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यांमध्ये कृषी कायद्यात दु्रुस्तीचे वचन दिले होते , जे शेतकऱ्यांची मते घेत आले आहेत आणि ज्यांनी काहीच केले नाही आणि या मागण्या टाळत आले अशांकडे खरेतर शेतकऱ्यांनी उत्तर मागितले पाहिजे.