कारवाईच्या भितीपोटी तरूणाची विहिरीत उडी घेवून आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी । चारचाकी चालवताना बैलगाडीला धक्का लागल्याने त्यामुळे पोलीस कारवाई होण्याच्या भीतीने प्रशांत भगवान पाटील (२२, रा.भातखेडे, ता.एरंडोल) या तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. दापोरा, ता.जळगाव शिवारात गुरुवारी दुपारी तीन वाजता विहीरीत तरंगताना त्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. शुक्रवारी मृतदेह बाहेर काढला जाणार असून जागेवरच शवविच्छेदन केले जाणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत पाटील याच्याकडे चारचाकी वाहन आहे. २५ फेब्रुवारी रोजी एरंडोल येथून येताना ताडे गावाजवळ बैलगाडीला चारचाकीची धडक लागली. त्यात बैलगाडी व चारचाकीचेही नुकसान झाले. यानंतर प्रशांत तेथून घरी न जाता गाडी दुरुस्तीला जातो सांगून शिरसोली येथे मावशीच्या गावाला आला. शेतापासून काही अंतरावर चारचाकी लावून त्याने विहिरीत उडी घेतली. दुसरीकडे दोन दिवस झाल्यानंतर प्रशांतशी संपर्क होत नाही व गाडी आढळून आल्याने कुटुंबियांची चिंता वाढली. त्यामुळे त्यांनी कासोदा पोलीस ठाणे गाठून हरविल्याची तक्रार दिली. दुसरीकडे त्याच दिवशी प्रशांत याला कोणी तरी फोन करुन बैलगाडीच्या नुकसानीमुळे पोलीस ठाण्यात केस होणार असल्याचे सांगितले. त्या भीतीनेच त्याने आत्महत्या केली असावी, अशी शक्यता वर्तविली जात आहे. 

 

विहीरीतून दुर्गंधी येत असल्याने मजुरांनी ही माहिती शेतमालकाला कळविली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर दापोरा येथील पोलीस पाटील जितेंद्र गवंदे, शिरसोलीचे श्रीकृष्ण बारी व शरद पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन एमआयडीसी पोलिसांना कळविले. पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह कुजलेला असल्याने पाण्यातच बरगड्या दिसून येत असल्याने जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले.  प्रशांत हा अविवाहीत होता. त्याच्या पश्चात आई, वडील व विवाहित बहीण असा परिवार आहे.

Protected Content