काँग्रेसने जे करायचं ते करावं; प्रफुल्ल पटेल संतापले

मुंबई : वृत्तसंस्था । राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी  काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली. “काँग्रेस पक्षाने जे करायचं आहे ते करावं” असं पटेल यांनी यावेळी बोलून दाखवलं.

 

सध्या महाविकासआघाडी सरकारमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या मागील काही दिवसांमधील वक्तव्यांमुळे व त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे काहीशी धुसफूस सुरू असल्याचे दिसत आहे. काँग्रेसकडून स्वबळाची भाषा केली जात आहे, तर राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नेते मंडळींकडून नाना पटोलेंच्या विधानाला फारसं महत्व देत नसल्याचं दाखवलं जात आहे.

 

प्रफुल्ल पटेल म्हणाले की, ”काँग्रेसचा अजेंडा काय आहे हे तुम्ही त्यांनाच विचारा, केवळ एकच मी सांगतो की महाविकासआघाडीचे जनक शरद पवार आहेत. कोणी काही म्हणो शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकार काम करत आहे. मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरे आहे त्यांच्या नेतृत्वात सरकार सुरू आहे. शरद पवार हे महाविकासआघआडीचे मार्गदर्शक आहे व ते या पुढेही राहतील. म्हणून बाकीची लोकं काय बोलतात, त्यावर आम्ही दररोज उत्तर द्यायचं, खुलासा करायचा हे मला काही योग्य वाटत नाही.”

 

”मला तर हे बोलायचं आहे की, एच के पाटील हे काँग्रेसचे राज्याचे प्रभारी आहेत त्यांनी काय सांगितलं आहे, मल्लिकार्जुन खर्गे हे त्यांचे राज्यसभेतील नेते आहेत, ते मुंबईल येऊन गेले. अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आहेत.. आम्ही कुणाच्या बोलण्यावर जावं? अशाप्रकारच्या नेहमीच्या वक्तव्यांमुळे महाविकासआघाडीत फार फरक पडत असेल, असं मला वाटत नाही. आता तो एक मीडिया इव्हेंट नक्कीच झालेला आहे. ज्याला जे करायचं आहे त्यांनी ते करावं, आम्ही एखाद्या पक्षाला बांधून थोडीचं ठेवलं आहे, ही आघाडी आहे. याशिवाय ज्या पक्षाला जे काही करायचं आहे, त्यासाठी आम्ही का उत्तर द्यावीत.” असं पटेल म्हणाले.

 

”एच.के.पाटील हे प्रभारी आहेत, ते काय म्हणतात याला मी जास्त महत्व देतो. त्यामध्ये जास्त तथ्यं असतं कारण ते थेट हायकमांडचे प्रतिनिधी म्हणून ते बोलतात. एच.के.पाटील, बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण हे तिघेही शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटायला गेले होते. याचा अर्थ काय? आता इशारा तुम्हाला माहितीच आहे.” असंही यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी बोलून दाखवलं.

 

Protected Content