एकनाथराव खडसेंना सत्तेत सहभाग मिळेल : रामदास आठवले

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) एकनाथराव खडसे यांच्या सारख्या नेत्यांना ते वरिष्ठ असल्याने दिल्लीत कोठेही सामावून घेता येईल. त्यांनाही सत्तेत सहभाग मिळेल असा मला विश्वास असल्याचे रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) प्रमुख तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

 

रामदास आठवले म्हणाले, मी नाराज होतो, मात्र आता नाराज होण्याची अजिबात आवश्यकता नाही. मला राज्यसभेचं सदस्यत्व मिळाले आहे. केंद्रीय राज्यमंत्रिपद मिळाले आहे. आम्हाला एक विधान परिषदेची जागा मिळावी अशी अपेक्षा होती. पण, तसे झाले नाही. वरिष्ठ नेत्यांना सत्ता मिळाली होती. त्यामुळे भाजपमध्ये पक्षासाठी रात्रंदिवस काम करणाऱ्या नवीन लोकांना संधी मिळणे आवश्यक होते. तसाच निर्णय पक्षाने घेतला आहे. एकनाथ खडसे यांच्या सारख्या नेत्यांना ते वरिष्ठ असल्याने दिल्लीत कोठेही सामावून घेता येईल. त्यांनाही सत्तेत सहभाग मिळेल असा मला विश्वास आहे. परंतू भारतीय जनता पक्षाचा निर्णय मान्य करणे अत्यंत आवश्यक आहे, असेही आठवले म्हणाले.

 

रामदास आठवले पुढे म्हणाले, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट आली, तरी भाजपचं सरकार येईल असे मला वाटत नाही. कारण भाजपला सत्ता स्थापनेसाठी आघाडीतील तीनपैकी एका पक्षाचा पाठिंबा लागणार आहे. तरच महायुतीचं सरकार येईल. त्यामुळे राष्ट्रपती राजवटीमुळे महायुतीचे सरकार येईल असे नाही. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या 54 हजारहून अधिक झाली आहे. महाराष्ट्र अगदी कोरोनामय झाला आहे. मुंबई देखील कोरोनामय झाली आहे. या कोरोनाचा सामना करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारची होती. मात्र, महाविकास आघाडीचं सरकार कोरोनाचा सामना करण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे सर्वाधिक 1 हजार कोरोना मृत्यू मुंबईत झाले आहेत. सध्याची राज्यातील परिस्थिती पाहता कोरोना नियंत्रणात महाविकास आघाडी अपयशी ठरले आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. आठवले यांनी देखील महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा सूर काढला आहे. परंतू अशा स्थितीत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट आली, तरी भाजपचे सरकार येईल असे मला वाटत नाही. कारण भाजपला सत्ता स्थापनेसाठी आघाडीतील तीनपैकी एका पक्षाचा पाठिंबा लागणार आहे. तरच महायुतीचे सरकार येईल. त्यामुळे राष्ट्रपती राजवटीमुळे महायुतीचे सरकार येईल असे वाटत नाही, असेही श्री. आठवले म्हणाले.

Protected Content