आयोध्यानगरातील क्वारंटाईन सेंटरमधून ऐवज लांबविणाऱ्या तिघांना पोलीस कोठडी

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील अयोध्यानगरातील महावितरणच्या क्वारंटाईन सेंटरमधून ६५ हजार १४५ रुपयांचा ऐवज लांबविल्याप्रकरणी काल तीन जणांना एमआयडीसी पोलीसांनी अटक केली होती. आज तिघांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. 

संतोष उर्फ बाळू नामदेव सैंदाणे वय ४५ रा. सदगुरु नगर,जळगाव, दत्तू नामदेव चौधरी वय ३७ रा. जैनाबाद, जळगाव व सुरेश उर्फ सागर प्रमोद सोनवणे वय ३५ रा. खेडी इंदिरानगर या तीन जणांना अटक केली. 

अयोध्यानगरातील महावितरणच्या परिमंडळ कार्यालयात परिसरातील कार्यालये व कर्मचार्‍यांच्या निवासस्थानांच्या इमारत क्रमांक ७ येथील खोली क्रमांक ३ व ४ या दोन्ही खोल्यांमध्ये क्वारंटाईन सेंटर उभारण्यात आले होते. २७ जुलै ३ ऑगस्ट दरम्यान क्वारंटाईन सेंटर बंद असतांना चोरट्यांनी या क्वारंटाईन सेंटरमधून ४ पलंग, ६ गाद्या, उशा, ६ पंखे असा एकूण ६५ हजार १४५ रुपयांचा मुद्देमाल लांबविला होता. याप्रकरणी १३ ऑगस्ट रोजी महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता नरेश मोरे यांच्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.

गुन्ह्यातील संतोष सैंदाणे, दत्तू चौधरी व सुरेश सोनवणे या तिघांना शनिवार, २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून गुन्ह्यातील संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. रविवार, २२ ऑगस्ट रोजी तिघा संशयितांना जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील हे करीत आहेत.

Protected Content