आता उध्दव ठाकरेंच्या जुन्या वक्तव्यावरून गुन्हा दाखल होण्याची शक्यता

यवतमाळ | नारायण राणे यांच्या वक्तव्याने उडालेली खळबळ ताजी असतांनाच आता गेल्या वर्षी दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी योगी आदित्यनाथ यांचे थोबाड फोडण्याची भाषा केल्याच्या वक्तव्यावरून त्यांच्यावर यवतमाळ जिल्ह्यात गुन्हे दाखल करण्याचे मनसुबे भाजप नेत्यांनी जाहीर केले आहेत.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल दसरा मेळाव्यात केलेल्या वक्तव्यावरुन, भाजप आता उद्धव ठाकरेंविरुद्ध तक्रार दाखल करणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील ५ पोलीस ठाण्यात भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात तक्रारी केल्या जाणार असल्याची माहिती भाजपचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी दिली. याच्या अंतर्गत उमरखेड, यवतमाळसह ५ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली जाणार आहे.

गेल्या दसरा मेळाव्यात उध्दव ठाकरे म्हणाले होती, शिवरायांना राज्याभिषेक करताना तिथून इथे गागाभट्ट आले होते. उत्तर प्रदेशातून गागाभट्ट आले होते. त्यांनी किती सन्मानाने शिवरायाला राज्याभिषेक केला. आणि हा योगी आला.. अशी टरटरुन..कसलं काय नसलं की म्हणजे गॅसचा फुगा असतो ना, काही नसतं गॅस असतो, पण हवेत उडत असतो, तसा हा गॅसचा फुगा आहे. आला तो सरळ चपला घालून महाराजांना हार घालायला गेला.. सरळ चपला घालून.. असं वाटलं त्याच चपला घ्याव्या आणि त्याचं थोबाड फोडावं लायकी तरी आहे का तुझी महाराजांच्या पुतळ्यासमोर राहण्याची..

आता याच वक्तव्यावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची तयारी भाजपने केल्याचे दिसून येत आहे.

Protected Content