आंध्र प्रदेशातही ऑक्सिजनअभावी १४ रुग्णांचा मृत्यू ?

 

 

 

 हैदराबाद : वृत्तसंस्था । आंध्रप्रदेशमधील अनंतपूर येथील  सरकारी कोविड रूग्णालयात शनिवारी १४ रूग्णांचा मृत्यू   ऑक्सिजनअभावी झाला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, हा आरोप फेटाळत रूग्णांचे मृत्यू ऑक्सिजन तुटवड्यामुळे झाले नसल्याचं जिल्हा प्रशासनाने म्हटलं आहे.

 

देशातील कोरोना संसर्गाचा दिवसेंदिवस उद्रेक होत आहे. दररोज लाखांच्या संख्येत नवीन बाधित आढळून येत आहे. रूग्णांच्या मृत्यू संख्येतही मोठी वाढ सुरू आहे.परिणामी आरोग्य यंत्रणा कोलमडत असल्याचे चित्र आहे. अनेक राज्यांमधील रूग्णालयांमध्ये ऑक्सिजनसह व्हेंटिलेटर, बेड, इंजेक्शन, लस आदींचा मोठ्याप्रमाणावर तुटवडा निर्माण झाल्याचे समोर येत आहे. तर, गंभीर बाब म्हणजे ऑक्सिजन अभवी रूग्णांचे मृत्यू देखील होत आहे.

 

ही घटना समोर आल्यानंतर सह जिल्हाधिकाऱ्यांनी रूग्णालयास भेट देऊन, ऑक्सिजन पुरवठ्याची प्रत्यक्ष पाहणी केली. ऑक्सिजन पुरवठ्याबाबत अफवा पसरवणाऱ्यांबद्दल चौकशी सुरू करण्यात आली आहे.

 

त्यांनी सांगितले की, आमच्या पथकाने ऑक्सिजन प्लॅन्टची पाहणी केली आहे. आम्ही वॉर्डात जाऊन प्रत्येक लाईन आणि वॉल्वची तपासणी केली. तिथं कुठल्याही प्रकराची गळती नाही. ऑक्सिजन प्लॅन्टचा दाब देखील योग्य प्रमाणात आहे. पुरवठ्यामध्ये कोणतीही अडचण नाही. ऑक्सिजनचा योग्यप्रकारे वापर सुरू आहे.

 

दरम्यान, काल दिल्लीत  देखील अशीच एक धक्कादायक घटना घडली, येथील बत्रा हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन अभावी एका डॉक्टरसह आठ रूग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले.

 

Protected Content