अन्नधान्याचे शिधापत्रिकाधारकांना घरपोच वितरण करावे खा. पाटील यांची मागणी

जळगाव, प्रतिनिधी । सध्याच्या परिस्थितीत कोरोना या विषाणूजन्य आजाराशी लढा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. केंद्र सरकारने नुकतीच १ लाख ७० हजार कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले असून पात्र लाभार्थ्यांना ही मदत मिळणार आहेच मात्र राज्यातील केशरी कार्डधारक तसेच अंत्योदय कार्डधारकाबरोबर तसेच जे राज्याचे रहिवाशी आहेत आणि ज्यांचे कुटुंब विभक्त झाले मात्र त्यांच्याकडे अद्यापही रेशन कार्ड नाही अश्या ही नागरिकांना अन्नधान्य मिळाले पाहिजे अशी आग्रही मागणी जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेश दादा पाटील यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात खासदार उन्मेश दादा पाटील यांनी म्हटले आहे की, सध्या लॉकडाऊन मुळे संसर्ग टाळण्यासाठी नागरिक घराबाहेर पडत नाही. सध्याच्या परिस्थितीत कोरोना कोविड – १९ या विषाणूजन्य आजाराशी लढा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. केंद्र सरकारने नुकतीच १ लाख ७० हजार कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. या पॅकेज मध्ये शासनाने लाभार्थ्यांना गहू, तांदूळ व डाळ देण्याचे ठरविले असून प्रति व्यक्ती ५ किलो रेशन देण्यात येणार असून २ रुपये किलोने गहू व ३ रुपये किलोने तांदूळ देण्याचे निश्चित केले आहे. शासनाच्या धोरणानुसार पात्र लाभार्थ्यांना ही मदत मिळणार आहेच मात्र राज्यातील केशरी कार्ड धारक तसेच अंत्योदय कार्ड धारकाबरोबर तसेच जे राज्याचे रहिवाशी आहेत आणि ज्यांचे कुटुंब विभक्त झाले मात्र त्यांच्याकडे अद्यापही रेशन कार्ड नाही अश्या ही नागरिकांना अन्नधान्य मिळाले पाहिजे. जेणेकरून देशात कोणीही अन्नधान्यावाचून भुकेला राहणार नाही. तसेच कोरोना सारख्या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर हे धान्य घेण्यासाठी रेशन धान्य दुकानदाराकडे एकाच वेळी गर्दी होईल परिणामी संसर्गजन्य आजारात गर्दी करू नये या भूमिकेला छेद दिला जाण्याची भीती आहे. याकरिता राज्यातील सार्वजनिक अन्नधान्य वितरण प्रणालीच्या माध्यमातून हे अन्नधान्य पुरवठा दुकानदारांच्या माध्यमातून संबधितांना घरपोच अन्नधान्य देण्यात यावे. यासाठी रेशन धान्य दुकानदारांना अतिरिक्त मोबदला दिल्यास प्रामाणिकपणे लाभार्थ्याना घरपोच अन्नधान्य वितरित झाल्याने संसर्ग टाळला जाईल. तसेच आपल्या हातून भूकेलेल्यांना घरपोच अन्नधान्य दिल्याचे समाधान मिळेल. आपल्या सारखा संवेदनशील मुख्यमंत्री यावर तात्काळ उपाययोजना करून योग्य तो आदेश देतील.अशा आशयाचे पत्र आज खासदार उन्मेश दादा पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना पाठविले आहे.

मागणीचे सोशल मीडियावर स्वागत
खासदार उन्मेश दादा पाटील यांनी राज्यातील शिधापत्रिकाधारक, बिगर शिधापत्रिकाधारक, वंचित गोरगरीब सर्वच घटकांना अन्नधान्य वाटप करण्याची मागणी केलेल्या पत्राचे अनेक रेशन धान्य दुकानदार आणि स्वयंसेवी संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी स्वागत केले आहे. अनेकांना दिवसभर काम केले तर सायंकाळी दोन घास अन्न मिळते अशा दुर्लक्षित घटकाना यामुळे दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ताबडतोब असे आदेश काढून घरपोच अन्नधान्य पोहच करावे या मागणीचे जोरदार स्वागत केले जात असून गोरगरिबांसह रेशन दुकानदारांनी या मागणीचे मोठे स्वागत केले आहे.

Protected Content