पहूर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये आणावे अशी मागणी करत विवाहितेला चापटाबुक्क्यांनी मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भात गुरुवार ४ मे रोजी दुपारी १ वाजता पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहूर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव जामनेर तालुक्यातील फत्तेपुर येथील माहेर असलेल्या रेश्माबी असलम शहा यांचा विवाह छत्रपती संभाजी नगर येथील असलम शहा अन्सार शहा यांच्याशी रितीरीवाजानुसार सन २०१६ मध्ये झाला. त्यानंतर पती याने किरकोळ कारणावरून विवाहितेला शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. त्यानंतर नवीन व्यवसाय करण्यासाठी माहेरहून २ लाख रुपये आणावे अशी मागणी केली. दरम्यान विवाहितेने पैसे आणले नाही म्हणून तिला मारहाण केली. तसेच सासू-सासरे यांनी देखील पैशांसाठी तगादा लावला. दरम्यान हा त्रास सहन न झाल्याने विवाहिता जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथील माहेरी निघून आल्या. गुरुवार ४ मे रोजी दुपारी १ वाजता पहुर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार पती असलम शहा अन्सार शहा, सासरे अन्सार शहा मुसा शहा आणि सासू सलमाबी अन्सार शहा तिघे रा. फुलेनगर, छत्रपती संभाजी नगर यांच्याविरोधात पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रवीण चौधरी करीत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.