
रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील वाघोडजवळील बऱ्हाणपूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या स्पीड ब्रेकरवरून मोटरसायकलस्वार पडून जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. मनीष मनोहर सोलंकी (वय २४, रा. दुगवाडा, ता. जी. खंडवा) असे मृत युवकाचे नाव असून, तो सावदा येथे कामासाठी जात असताना हा अपघात झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

प्राप्त माहितीनुसार, काल सायंकाळी मनीष सोलंकी आपल्या दुचाकीने राष्ट्रीय महामार्गावरून सावदा दिशेने जात होता. वाघोडजवळ अचानक आलेल्या स्पीड ब्रेकरवरून त्याची गाडी असंतुलित झाली आणि तो रस्त्यावर आदळून पडला. अपघात इतका भीषण होता की त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताच्या ठिकाणी कोणतीही सूचना फलक, रिफ्लेक्टर अथवा स्पीड ब्रेकरचे स्पष्ट चिन्ह नव्हते, हे यामधून उघड झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच रावेर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक मनोज महाजन यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास रावेर पोलीस करीत आहेत. युवकाच्या अपघाती मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
हा अपघात केवळ वेगमर्यादा किंवा निष्काळजीपणामुळे नाही, तर अपुऱ्या आणि गैरव्यवस्थित रस्त्यांच्या व्यवस्थेमुळे घडल्याचे नागरिक सांगत आहेत. अपुऱ्या प्रकाशयोजना, अयोग्य स्पीड ब्रेकर आणि यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे दरवर्षी अशा दुर्घटना घडत आहेत. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.



