Home क्राईम खळबळजनक : शेतीच्या वादातून प्राणघातक हल्ला; तरूणाचा मृत्यू

खळबळजनक : शेतीच्या वादातून प्राणघातक हल्ला; तरूणाचा मृत्यू

0
24

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शेतीच्या वादातून झालेल्या प्राणघातक हल्ल्यात तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना आज घडली. जिल्हा शासकीय रूग्णालयात नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती. याप्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

 

याविषयी अधिक माहिती अशी की, आबा भगवान महाजन हे आपल्या पत्नी व दोन मुलांसह एरंडोल शहरातील मारोती मढी येथे वास्तव्याला आहे. त्यांना , सुरेश, तुकाराम आणि मगन असे तीन भाऊ आहे. त्यांच्या आईच्या हिस्स्याचे शेत जो मुलगा करेल तो मुलगा त्यांना वर्षांला १५ हजार रूपये देईल असे ठरविण्यात आले होते. दरम्यान, यावर्षी याच शेताच्या वादातून आबा महाजन यांचे इतर तिन भाऊ सुरेश, तुकाराम आणि मगन यांच्याशी गुरूवार १२ मे रोजी वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आबा महाजन यांना मारहाण करत असल्याचे पाहून त्यांचा मोठा मुलगा उमेश हा तिथे आला. याचा राग आल्याने सुरेश महाजन, तुकाराम महाजन, मगन महाजन, तुकारामचा मुलगा मनोज आणि पत्नी उषा बाई आणि इतरांना आबा महाजन आणि उमेश महाजन यांनाबेदम मारहाण केली. तर उमेशला गुप्तांगावर लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने एरंडोल ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान त्यांचा प्रकृती गंभीर असल्याने  वैद्यकीय अधिकारी यांनी जळगाव येथे जाण्याचा सल्ला दिला. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले.

 

जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा शासकीय रूग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह आणण्यात आला असून जोपर्यंत गुन्हा दाखल करून अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा मयताचा भाऊ निलेश याने घेतला आहे. मयताच्या पश्चात आई सुनिता, वडील आबा महाजन, भाऊ निलेश, पत्नी मयूरी, बहिण रूपाली असा परीवार आहे. याबाबत पोलीसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.


Protected Content

Play sound