कर्जबाजारीतून विटनेरच्या शेतकऱ्याची विष घेवून आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील विटनेर येथील ४९ वर्षीय शेतकऱ्याने कर्जाच्या विवंचनेतून विष घेवून जीवनयात्रा संपविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

 

शेतकरी गोकुळ पांडुरंग वराडे (वय ४९) रा. विटनेर ता.जि.जळगाव असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. यासंदर्भात माहिती अशी की, गोकुळ वराडे मकर संक्रातीला शेतात फवारणीसाठी गेले होते. यादरम्यान त्यांनी विषारी द्रव्य सेवन केले होते. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कुटूंबाने त्यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना रविवारी रात्री ११ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

 

वराडे यांनी जळके स्टेट बँक शाखेतून शेतासाठी कर्ज घेतले आहे. त्यांच्याकडे स्वतः च्या मालकीचे विटनेर शिवारात एकूण ८० आर जमीनीचे क्षेत्र आहे. कर्जाच्या नैराश्यातून आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस प्रदिप पाटील करीत आहेत.

Protected Content