नवी दिल्ली । खुद्द राहूल गांधी यांनी गुलाम नबी आझाद यांच्यावर भाजपशी हातमिळवणी केल्याचा आरोप केल्यानंतर एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी त्यांची खिल्ली उडवत तुम्ही कुठवर गुलामी करणार असा खोचक प्रश्न विचारला आहे.
एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी गुलाम नबी आझाद यांना काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीतील घटनाक्रमानंतर फटकारले आहे. ओवेसी म्हणाले की गुलाम नबी आझाद जेव्हा जेव्हा हैदराबादला येत असत तेव्हा त्यांनी मला व माझ्या पक्षावर आरोप केले की तुम्ही भाजपाला पाठिंबा देत आहात. ते म्हणायचे की आम्ही भाजपची बी टीम आहोत. आज त्यांच्या पक्षाच्याच राहुल गांधींनी त्यांना सांगितले आहे की आपण पक्षाच्या पत्रावर सही केली आणि भाजपला पाठिंबा दर्शविला. यामुळे गुलाम नबी आझाद यांना आता किती काळ काँग्रेसची गुलामगिरी करता येईल याचा विचार करावा लागेल असे ओवेस म्हणाले.
ओवेसी म्हणाले की गुलाम नबी आझाद गेली ४५ वर्षे काँग्रेस पक्षात आहेत. आज ते नेते स्वत: वर आरोप करीत आहेत की ते भाजपला पाठिंबा देत आहेत. स्वत: गुलाम नबी आझाद यांनी माध्यमांना सांगितले की मी जर भाजपला भेटलो तर मी राजीनामा देण्यास तयार आहे. यावरून हे सिद्ध झाले आहे की जर तुम्ही काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाला विरोध केला तर तुम्हाला भाजपमध्ये आणले जाईल. आता आपणास त्या मुस्लिम नेत्यांनी विचार करावा लागेल जे काँग्रेस पक्षात आपला वेळ घालवत आहेत. जेव्हा आपल्यावर आरोप ठेवले जातील, आपण किती काळ अशी गुलामगिरी करत रहाल? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.