अमळनेर (प्रतिनिधी) पारोळा तालुक्यातील धाबे ही आदिवासी भिल्ल समाजाची सहाशे लोकसंख्या असलेली लोकवस्ती. हे गाव भीषण पाणी टंचाईचा सामना करीत आहे. धाबे गावास पुरेशा प्रमाणात टँकर न दिल्यास तहसील कार्यालयावर मुक्कामाचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
धाबे गांवाची तहान भागविण्यासाठी एकमेव विहीर असून तीच्या पाण्याने मागील दोन महिन्यांपासून तळ गाठला आहे. मार्चच्या सुरुवातीपासुनच पंचायत समिती पारोळाच्या माध्यमातुन गावासाठी पाण्याचा टँकर सुरू करण्यात आला होता. परंतु , हा टँकर नियमित येत नसल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. यासोबतच वापरण्याच्या पाण्याचा तीव्र टंचाई सहन करावी लागली आहे. पिण्याच्या पाण्याचे जार हिरापूर येथे विकत मिळतो. मात्र, हे जार विकत घेणेही गावकऱ्यांना परवडत नसल्याने महिला, पुरुष, व लहान लहान मुलं उन्हातान्हात पायाला चटके खात पाण्याच्या शोध घेत इकडे तिकडे भटकत आहेत. तरी प्रशासनाने गावकऱ्यांची पाण्यासाठी होणारी ससेहोलपट लक्षात घेवुन गावाला दररोज पुरेल एवढा तरी पाण्याचा टॅन्कर द्वारा पुरवठा नियमित सुरू करावा. गांवात शेळी पालन हा व्यवसाय मोठया प्रमाणात असल्यामुळे त्यांचे व गुराढोरांचीही पाण्याशिवाय होरपळ होत आहे. काही ग्रामस्थवस्ती सोडुन इतरत्र स्थलांतरीत होण्याचाही विचार करीत आहेत. या मागणीची दखल त्वरीत न घेतल्यास सर्व गाव तहसिल कार्यालयात मुक्कामाला येण्याच्या विचारात आहे असे ग्रामपंचायत सदस्य अशोक भिल व रेखा भिल, रमेश भिल, वीर एकलव्य बजरंग ग्रुपचे अध्यक्ष रविंद्र भिल यांनी बोलुन दाखविले.