

नवी दिल्ली वृत्तसंस्था । दहशतवाद्यांबाबत पाकला वेळोवेळी माहिती देऊनही त्यांनी काहीही कारवाई केली नाही. यामुळे आज पहाटे भारताने हवाई कारवाई करून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केल्याची माहिती विदेश सचिव विजय गोखले यांनी दिली.

विदेश सचिव विजय गोखले यांनी आपला पत्रकार परिषदेत आजच्या हल्ल्याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, १४ फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाला होता. या आधी आणि नंतरदेखील पाकला त्या देशातील दहशतवादी संघटना आणि त्यांच्या म्होरक्यांची माहिती देण्यात आली होती. मात्र पाकने यावर काहीही कारवाई केली नाही. दरम्यान, जैश-ए-मोहंमद ही संघटना देशात आणखी आत्मघाती हमले करणार असल्याची माहिती समोर आली होती. यामुळे गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आज पहाटे हवाई कारवाई करण्यात आली.
हा हल्ला फक्त दहशतवाद्यांना टार्गेट करून करण्यात आला होता. यात पाकचे लष्कर तसेच तेथील नागरिकांना कोणतीही हानी होणार नसल्याची काळजी घेण्यात आली. ही नॉन-मिलीट्री एयर स्ट्राईक असल्याचे गोखले यांनी नमूद केले. यात जैशचा सर्वात मोठा ट्रेनींग कँप उध्वस्त करण्यात आला. यामध्ये या संघटनेचे कमांडर, ट्रेनर आणि अन्य दहशतवाद्यांना यमसदनी पाठविण्यात आल्याची माहिती विदेश सचिव विजय गोखले यांनी दिली.
#WATCH: Foreign secretary Vijay Gokhale briefs the media in Delhi https://t.co/Th0TjwO99o
— ANI (@ANI) February 26, 2019


