
बोदवड प्रतिनिधी । शहरातील तीव्र पाणी टंचाई लक्षात घेता संजय वराडे व प्रमिला वराडे यांनी ‘ना नफा ना तोटा’ तत्वावर टँकरने पाणी वाटप सुरू केले आहे. त्यांनी सुरू केलेल्या या भागातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

याबाबत वृत्त असे की, शहरातील ठाकरे नगर, साकला कॉलनी, रेणुका नगर, सहकार नगर, विद्या कॉलनी, गोमाता नगर, शारदा कॉलनी, आनंद नगर व परिसरातील लोकांना पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत आहे. अनेक महिलांना व पुरुषांना कामधंदे सोडून पाण्यासाठी वणवण फिरावे लागत होते.शहरात ५००० लिटर पाण्याचे टँकर १००० रुपयांना विकले जात आहे. याची दखल घेऊन या भागातील संजय वराडे व प्रमिला वराडे यांनी स्वतःचे ट्रॅक्टर व टँकरच्या सहाय्याने कुठल्याच प्रकारचा नफा न घेता प्रभाग क्र दोन व सात मध्ये ५०० रुपये प्रति टँकरप्रमाणे पाणी विक्री सुरु केली आहे. त्यामुळे परिसरातील लोकांना दिलासा लाभला आहे.



