बीड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | उध्दव ठाकरे आज शिंदे समर्थकांवर टीका करत असले तरी त्यांची १९९६ सालीच मुख्यमंत्री बनण्याची इच्छा होती असा गौप्यस्फोट माजी मंत्री सुरेश नवले यांनी केला आहे.
माजी मंत्री सुरेश नवले यांनी आज बीडमध्ये पत्रकार परिषद घेऊन उध्दव ठाकरे यांच्यावर तोफ डागली. ते म्हणाले की, १९९६ पासून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायची इच्छा होती. मात्र ती पूर्ण झाली नाही. १९९५ साली शिवसेना-भाजप युतीचं सरकार पहिल्यांदा सत्तेत आलं होतं. त्यावेळी सुरुवातीला मनोहर जोशी यांना मुख्यमंत्रीपदाचा मान मिळाला. नंतर फेब्रुवारी १९९९ ते ऑक्टोबर १९९९ अशा नऊ महिन्यांच्या कालावधीसाठी नारायण राणे यांंच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. मात्र या आधीच उध्दव ठाकरे यांच्या सांगण्यावरून आमदारांचा एक गट हा त्यांना मुख्यमंत्री बनवा म्हणून बाळासाहेबांना भेटला होता.
माजी मंत्री सुरेश नवले आता शिंदे गटात असून आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी जोरदार टीका केली. तसेच, दसरा मेळाव्याला बीड जिल्ह्यातून पाच हजाराहून अधिक शिवसैनिक उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी याप्रसंगी दिली.