सायगाव येथील दोन तरूणांचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू

चाळीसगाव प्रतिनिधी । धाब्यासाठी खारी घेण्यास गेलेल्या तरूणाची बैलगाडी नाल्यात उलटल्याने दोन तरूणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील सायगाव येथे आज दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील सायगाव येथील राकेश चिला अहिरे (१९) व सुखदेव जगन जाधव (१८) दोघेही रा. सायगाव ता. चाळीसगाव हे धाब्यावर खारी टाकण्यासाठी बैलगाडीने घ्यायला सतारी शिवारात गेले होते. दरम्यान बैलगाडीत खारी भरून सतारी नाला बंधाऱ्यात पाण्यातून गावाकडे येत असताना अचानक बैलाचा पाय सटकला आणि गाडी उलटून बंधाऱ्याच्या पाण्यात उलटली. दोघांनाही पाण्यात पोहता येत नसल्याने पाण्यात बूडून त्यांचा दुदैवी मृत्यू झाला. तत्पूर्वी बकरी चारणारा अशोक दळवी यांनी फोनद्वारे गावातील नागरिकांना याबाबत माहिती दिली. त्यावर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याअगोदरच आसपासच्या काही जणांनी दोघांना वरती काढून ठेवले होते. तेव्हा सतिष निंबा महाजन यांनी लागलीच खासगी वाहनाने तातडीने पुढील उपचारासाठी चाळीसगाव येथील समर्थ दवाखान्यात दाखल केले.  वैद्यकीय अधिकारी डॉ. राहूल वाघ यांनी तपासून मयत घोषीत केले. ही घटना दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली असून याबाबत परिसरात हळहळ व्यक्त होत आहेत. सतिष निंबा महाजन यांच्या फिर्यादीवरून मेहूणबारे पोलिस स्थानकात रात्री उशीरापर्यंत नोंद घेण्याचे काम सुरू होते. 

Protected Content