खाणीच्या पाण्यात दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

धुळे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | धुळे तालुक्यातील निमडाळे येथील जयहिंद हायस्कूलमधील आठवीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा खाणीत साचलेल्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. जयहिंद हायस्कूलचे काही विद्यार्थी वन भोजनासाठी गेले असताना ही घटना घडली. याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. हितेश विजय पाटील आणि मयूर वसंत खोंडे असे दोन्ही मुलाचे नाव आहे.

मिळालेली माहिती अशी की, धुळे तालुक्यातील निमडाळे येथील जयहिंद हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना शुक्रवारी गावापासून साधारणपणे दोन ते तीन किलोमीटरवरील शिफाई धरण परिसरात वनभोजनासाठी नेण्यात आले होते. काही विद्यार्थी यावेळी दगड खाणीत साचलेल्या पाण्यात उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने हितेश व मयूर हे दोघे बुडाले. इतर विद्यार्थ्यांनी आरडाओरड केल्यावर त्यांना उपस्थित शिक्षकांनी पाण्याबाहेर काढले. दोघांनाही धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली. या घटनेला उपस्थित शिक्षकांना जबाबदार धरले जात असून ग्रामस्थांकडून संबंधित संस्था व कर्मचाऱ्यांच्यावर रोष व्यक्त करण्यात येत आहे.

 

Protected Content