जळगाव (प्रतिनिधी) शहरातील अत्यंत महत्त्वाचा चौक असलेल्या अजिंठा चौफुली येथे वाहतूक शाखेचे कर्मचारी नसल्याने वाहतूक यंत्रणा पूर्णतः कोलमडल्याचे दृश्य आज सकाळी साडेनऊ ते सव्वा अकराच्या सुमारास दिसून आले. यावेळी प्रचंड प्रमाणात दुचाकी स्वार लहानमोठी आणि अवजड वाहने अडकल्याने व मोठी कोंडी झाल्याने थेट नशिराबाद , कुसुंबा तसेच शिवकॉलनीपर्यंत सुमारे तीन किलोमीटरची वाहनांची रांग लागलेली होती. दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते वाघुळदे व स्वयंसेवकांनी केली वाहतूक सुरळीत केली.
सामाजिक कार्यकर्ते व कलावंत तुषार वाघुळदे आणि निलेश हटकर हे काही कामानिमित्त औरंगाबादरोडने पहूरकडे जात असताना अजिंठा चौफुली येथे कोणताच वाहतूक शाखेचा कर्मचारी तिथे तैनात नसल्याचे लक्षात आले. शिवाय सिग्नल यंत्रणाही कार्यान्वित नव्हती .श्री.वाघुळदे आणि किशोर परदेशी यांनी वाहतूक शाखा , एमआयडीसी पोलीस ठाणे आणि नियंत्रण कक्ष येथे फोन केला असता पोलीस कर्मचारी दुसऱ्या ठिकाणी बंदोबस्तासाठी पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले. तेव्हा सामाजिक आत्मभान म्हणून वाहतूक सुरळीत करण्यासाठी तुषार वाघुळदे , चेतन पाटील ,किशोर परदेशी , गणेश जावळे , पप्पू पाटील , महेश भंगाळे ,शिवा माळी आदींनी सुमारे सर्व कामे बाजूला ठेऊन दीड तास वाहतूक सुरळीत करण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. दोन अंबुलन्समध्ये गंभीर रुग्ण असल्याने त्यांनाही तात्काळ वाट करून दिली. सर्व वाहनधारकांना व्यवस्थित प्रेमाने समजूत घालून ते यंत्रणा सुरळीत करीत होते.
कोंडीतून वाहन धारकांना मार्ग काढणे खूपच अवघड झाले होते .स्वयंसेवकांनी वाहतूक यंत्रणा सुरळीत केल्याने वाहन धारकांना सुखद धक्काही बसला आणि काहींनी तर कौतुकही केले. या चौकातील वाहतूक समस्या खूप जटील झाली आहे. या परिसरात सतत गजबज आणि मोठी रहदारी असते. चौकातील सिग्नल्स नादुरुस्त आहेत. याकडे महापालिकेचे दुर्लक्ष दिसून येत आहे. वास्तविकता सकाळची साडेनऊ ते अकरा ही वेळ अत्यंत रहदारीची असते. याच कालावधीत तिथे वाहतूक शाखेचे कर्मचारी तैनात नव्हते. याबद्दल शेकडो वाहन धारकांना संताप व्यक्त केला. साडे अकरानंतर पोलीस अधिकारी युसुफ पठाण आणि कर्मचारी योगेश पाटील, संजय नाईक हे चौफुलीवर पोहचले, तोपर्यंत वाहतुकीची कोंडी जवळपास सुरळीत झाली होती. आज सकाळी नऊ ते साडे अकरा पर्यंत वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी तैनात नसल्याने संताप व आश्चर्य व्यक्त होत होते. वाहतूक यंत्रणा वाऱ्यावर सोडली की, काय असाही प्रश्न अनेक वाहन धारकांनी व्यक्त केला.