पिंप्री खुर्द, तालुका धरणगाव : ( संतोष पांडे )
तालुक्यात यंदा दुष्काळ परिस्थिती असल्याने कूपनलिका तसेच विहिरीचे पुनर्भरण झालेले नाही तसेच या भागात पाटचारी किंवा नदीवर सिंचन प्रकल्प नाही. त्यामुळे 70 टक्के बागायती क्षेत्र हे धोक्यात आलेले आहे. दुष्काळाची गंभीर परिस्थिती लक्षात घेता अंजनी नदीवर पाणी अडविण्यासाठी ना. गुलाबराव पाटील तसेच जि. प. सदस्य गोपाल बापू चौधरी यांनी निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून येथे स्वखर्चाने बंधारा बांधण्याचे काम सुरू केलेले असून या बंधाऱ्याचे काम प्रगतीपथावर आहे. या बंधाऱ्याच्या जवखेडा, हिंगोणे, कल्याणे, भोद पिंप्री, सोनवद तसेच परिसरातील अनेक गावाना शेतीसाठी लाभ होणार आहे.
दुष्काळग्रस्त परिस्थिती कूपनलिका व विहिरींमधून सप्टेंबरपासूनच उपसा सुरू झालेला आहे. विहिरींची पाणी पातळी दिवसेंदिवस खालावत असून सुमारे 4000 हजार हेक्टर वरील शेत जमीन संकटात आलेली आहे. परंतु पिण्याचे पाणी व इतर कारणांसाठी शासन स्तरावरून तरतूद नसल्याने ना. गुलाबराव पाटील तसेच जि. प. सदस्य गोपाल बापू चौधरी यांनी पुढाकार घेत स्वखर्चातून बंधाऱ्याचे काम सुरु केले आहे. दरम्यान, या बंधाऱ्याच्या कामासाठी कल्याणे येथील सोपान बोरसे, अनिल महारु पाटील, तसेच लोकनियुक्त सरपंच रमेश राजाराम पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांचे सहकार्य लाभत आहे.