नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आयोध्येतल्या राममंदिर खटल्यात साज नाट्यमय घडामोड घडली आहे. या खटल्यातले पक्षकार असलेल्या सुन्नी वक्फ बोर्डाने या वादग्रस्त जमिनिवरील दावा सोडला आहे. आता सुन्नी वक्फ बोर्ड याप्रकरणी आपली याचिका मागे घेणार आहे. त्यामुळे अयोध्येतील राम मंदिर प्रकरणी आज (बुधवार) सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, अयोध्येत हाय अलर्ट असून सुरक्षेसाठी तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
सुन्नी वक्फ बोर्डाने दावा सोडल्याचे प्रतिज्ञापत्र मध्यस्थ समितीला पाठवले आहे. मध्यस्थ समितीच्या तीन जणांपैकी एक असलेल्या श्रीराम पंचू यांना सुन्नी वक्फ बोर्डानं हे प्रतिज्ञापत्र पाठवलंय. राम जन्मभूमी खटल्याच्या युक्तिवादाचा आज अखेरचा दिवस आहे. त्यामुळे अखरेच्या टप्प्यात या खटल्याला नाट्यमय कलाटणी मिळाली आहे. अयोध्येतील राम मंदिर प्रकरणी आज) सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी याबाबत मंगळवारी संकेत दिले. मंगळवारी अयोध्या प्रकरणी सुनावणीचा ३९ वा दिवस होता. तसंच सर्व पक्षकारांनी आपला युक्तीवाद बुधवारी पूर्ण करण्याचे आदेशही काल झालेल्या सुनावणीदरम्यान देण्यात आले होते. दरम्यान, या पार्श्वभूमीवर अयोध्येमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे.
अयोध्येत हाय अलर्ट ; सुरक्षेसाठी तगडा बंदोबस्त तैनात
सुरक्षेसाठी अयाेध्येचे लाल, पिवळा, निळा तीन भागांत विभाजन केले आहे. लाल भागात वादग्रस्त जागेची सुरक्षा आहे. येथे सुरक्षा दल अत्याधुनिक शस्त्र, वाॅच टाॅवर, ड्राेन कॅमेरा, सीसीटीव्हीने सज्ज आहे. लाल विभागाची सीमा राम जन्मभूमीच्या एक कि.मी. परीघात ठेवली आहे. पिवळ्या भागात पूर्ण अयाेध्या नगरी सीमाकक्षात ठेवण्यात आली आहे. बाहेरील भाग निळ्या विभागात आहे. २४ तास येथे सुरक्षा तैनात असते.अयाेध्येत येणारे सर्व रस्ते, घाट, शरयू नदीच्या किनाऱ्याची देखरेख करण्यासाठी लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्त केले आहेत. कॅमेऱ्यांची संख्या शेकडाेमध्ये असून त्याचे कंट्राेल कमांड सेंटर नया घाट पाेलिस चाैकीवर तयार केले आहे. अयाेध्येत सर्व प्रवेशद्वारांवर बारकाेडिंग केले आहे. येथे एक निरिक्षक, एक उपनिरिक्षक यांच्यासह ६ पाेलिस तैनात करण्यात आले आहेत. सुरक्षेसाठी पीएसीच्या ४७ कंपन्या मागवण्यात आल्या आहेत. येणाऱ्या दिवसात २०० कंपनी पीएसी व अर्धसैनिक बल तैनात केले जाईल.