राज्य शासनाने फळ पीक विम्याची मुदत वाढविली

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना सन २०२४-२५ व २०२५-२६ या दोन वर्षात राबवण्यासंदर्भात राज्य शासनाने मान्यता दिली. मृग बहार व आंबिया बहारातील ठराविक फळ पिकांचा विमा भरून शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. या हंगामात राज्यात डाळिंब, संत्रा, मोसंबी, चिकू, पेरू, लिंबू, सीताफळ, द्राक्ष, आंबा, पपई, काजू, स्ट्रॉबेरी व द्राक्ष क इत्यादी पिकांचा फळपीक विमा योजनेत समावेश करण्यात आला आहे.

भारतीय कृषी विमा कंपनी, बजाज अलियांज, फ्युचर जनरल आणि युनिव्हर्सल सोम्पो या चार कंपन्यांच्या मार्फत ही योजना राबविण्यात येणार आहे. मृग बहरात द्राक्ष, काजू, संत्रा, पेरू, लिंबू या चार पिकांसाठी विमा भरण्याची अंतिम मुदत २५ जून निश्चित करण्यात आली आहे. त्याचबरोबर मोसंबी चिकू ३० जून, डाळिंब १४ जुलै तर सीताफळ पिकासाठी ३१ जुलै ही मुदत देण्यात आली आहे. दरम्यान २०२४ ते २६ या दोन वर्षात राबविण्यात येणा-या फळपिकविमा योजनेचे स्वरूप, विमा संरक्षित रक्कम यांसह सविस्तर माहिती कृषी विभागाकडून जारी करण्यात आली असून, फळ उत्पादक शेतक-यांनी विहित मुदतीत आपला विमा भरून घ्यावा, असे आवाहन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

Protected Content