धानोरा/अडावद (प्रतिनिधी) येथील ग्रामपंचायतची जुनी इमारत पाडण्याचे काम सुमारे एक महिन्यांपासुन रखडल्याने अंगणवाडीतील चिमुकल्यांचा जीवाला धोका निर्माण झाला आहे. सदर इमारतीचे वरचा एकच मजला पाडण्यास सुरुवात झाली होती. त्यानुसार एक खोली पाडलीही गेली होती, पण अचानक काम बंद झाल्याने ती इमारत कधीही कोसळू शकते, अशी स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे या भागातून आंगणवाडीत जाणाऱ्या लहान मुलांच्या आणि या मार्गावरून वावरणाऱ्या सगळ्याच ग्रामस्थांच्याही जीवितास धोका निर्माण झाला आहे.
या इमारतीच्या भिंतींना मोठमोठे तडे पडलेले असल्याने याठिकाणी जातांना नागरिक जीव मुठीत धरून जात होते. इमारतीच्या खालच्या मजल्याला लावण्यात आलेले लाकडाचे सरेही जीर्ण झाल्याने ते आता पडायला सुरुवात झाली होती. यामुळे ग्रामसभेत ही इमारत पाडण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार इमारत पाडण्यासाठी ग्रामपंचातीने दि ३ मार्च २०१८ रोजी एक प्रस्ताव जिल्हा परिषद सदस्य दिलीप पाटील यांच्याकडे सादर करून त्यांनी हा विषय लावून धरल्यामुळे ही इमारत पाडण्यासाठी मंजुरी मिळाली होती. इमारत पाडण्यास सुरुवातही करण्यात आली होती. त्यानंतर गावातीलच काही राजकीय पुढाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे इमारत पाडण्यास विलंब होत असून यामुळे या इमारतीचा धोका निर्माण झाला आहे. अंगणवाडीतील पाल्यांच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. तसेच परिसरातील रहिवासी व दुकानदारांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. एकूणच ग्रामस्थांमध्ये याबाबत तीव्र नाराजी दिसून येत आहे. इमारतीचा एखादा भाग कोसळून अप्रिय घटना घडल्यास त्याला जबादार कोण ? असा सवाल ग्रामस्थ विचारात आहेत. यामुळे गावाच्या विकासासाठी राजकीय डावपेच बाजूला ठेवून जुनाट इमारत पडण्याच्या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे व हा प्रश्न लवकर मार्गी लावावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.