बर्थडे पार्टीत दारूवरून वाद झाल्याने मित्रांनीच केली बर्थडे बॉयची हत्या

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | वाढदिवसाच्या पार्टीत दारूवरून वाद झाल्याने तीन मित्रांनी बर्थडे बॉयची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. बर्थडे बॉयला चौथ्या माळ्यावरून ढकलून देत त्याचा खून केल्याचा प्रकार उल्हासनगरमध्ये घडला आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी मृत तरुणाच्या तीन मित्रांना बेड्या ठोकल्या आहेत.

चिंचपाडा परिसरात राहणारा कार्तिक वायाळ याचा 27 जून रोजी वाढदिवस होता. त्यानिमित्त त्याने त्याचे मित्र निलेश क्षीरसागर, सागर काळे आणि धीरज यादव यांना पार्टी दिली. चिंचपाडा गावातील आर्या अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरील निलेश क्षीरसागर याच्या फ्लॅटमध्ये ही पार्टी सुरू होती. मात्र या पार्टीत दारूवरून वाद झाला. या वादात कार्तिक याने निलेशच्या डोक्यात दारूची बाटली फोडली.

याचा राग आल्यामुळे निलेश, सागर आणि धीरज या तिघांनी कार्तिक याला चौथ्या मजल्यावरून थेट इमारतीवरुन खाली ढकलून दिलं. यात कार्तिकचा मृत्यू झाला. मात्र ही हत्या नसल्याचा बनला तिघांनी रचला. यानुसार त्यांनी सांगितले की, कार्तिकने निलेशच्या डोक्यात बाटली मारल्याने तो जखमी झाला होता. त्यामुळे आम्ही त्याला रुग्णालयात नेले. तिथून परत आल्यानंतर कार्तिक हा इमारतीच्या खाली मृतावस्थेत आढळला. मात्र कार्तिकच्या वडिलांनी या तिघांवर संशय व्यक्त केल्याने पोलिसांनी या तिघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करत त्यांना ताब्यात घेतलं. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी कार्तिकच्या हत्येची कबुली दिली. याप्रकरणी या सर्वांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली आहे. वाढदिवसाच्या पार्टीतच कार्तिकची हत्या झाल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Protected Content