मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | राज्यात महाविकास आघाडीचे नेते विविध मुद्द्यावर टीका चांगली करतात, पण मराठा, ओबीसी आरक्षण, एसटी कामगार, शेती सिंचनाच्या तसेच शेतकऱ्यांच्या वीज समस्यांसह तुमच्या बुडाखाली काय जळतेय, त्यावर बोला अशी टीका भाजपचे आ. नितेश राणे यांनी केली आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी बीकेसीतील सभेत भाजपवर टीका, टोमण्याचा भडीमार केला. यावर भाजपकडूनही त्याच आक्रमकतेने प्रत्युत्तर दिले जात असून बीकेसीच्या सभेत ना मुख्यमंत्री दिसले, ना पक्षप्रमुख दिसले, एक आजारी, बिथरलेल्या माणसासारखेच दिसले. त्यांना औषधांचा डोस मोठ्या प्रमाणात आहे तो कमी करा, डॉक्टरहि त्यांना का एवढा त्रास देतात? असा प्रश्न भाजपा आ. नितेश राणे उपस्थित केला.
इतरांच्या व्यंगावर भाष्य करता, स्वताच्या जवळच्या व्यक्तीचा आवाजावर बोलले तर एवढे का बिथरता? मातोश्रीच्या नावावर घोटाळे होतात, तसेच भ्रष्टाचारी माणसाचे समर्थन करावे लागते हे सिध्द झाले आहे. किरीट सोमय्या, नवनीत राणांवर हल्ला झाला त्यांना सुरक्षा का देण्यात येते, पालघरच्या साधूंची हत्या झाली त्यांना न्याय नाही, रझा अकादमीवर बंदी घालण्यात तुमचे हिंदुत्व नाही, तुमच्या सोयीनुसार हिंदुत्वाची चौकट उभी करता, अशा मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा ठेवणेच चुकीचे आहे. असेहि आ. राणे म्हणाले