जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या २६ वर्षीय तरुणावर जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात आधुनिक ईसीटी (Electroconvulsive Therapy) तंत्रज्ञानाच्या सहाय्याने यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. केवळ १५ दिवसांत त्याच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाल्याने मानसिक आरोग्य क्षेत्रात आशेचा किरण निर्माण झाला आहे.
रावेर तालुक्यातील मयूर (नाव बदललेले) या २६ वर्षीय तरुणाला गेल्या पाच वर्षांपासून मानसिक आजाराची लक्षणे जाणवत होती. त्याला सतत चिडचिड होणे, अनावश्यक भीती वाटणे, आजूबाजूच्या लोकांवर संशय घेणे, घराबाहेर पडण्यास टाळाटाळ करणे आणि एकटे राहण्याची सवय लागणे अशा समस्या भेडसावत होत्या. कालांतराने त्याची अवस्था अधिकच गंभीर होत गेली. कुटुंबीयांनी विविध ठिकाणी उपचार घेतले, अनेक तज्ज्ञांचा सल्ला घेतला; मात्र अपेक्षित सुधारणा दिसून येत नव्हती.

अखेरीस कुटुंबीयांनी त्याला जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल केले. येथे मानसिक आरोग्य विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांनी त्याची सखोल तपासणी करून आजाराचे स्वरूप समजून घेतले. औषधोपचारांसोबतच आधुनिक ईसीटी उपचार पद्धतीचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला. ईसीटी ही गंभीर मानसिक आजारांमध्ये वापरली जाणारी सुरक्षित आणि प्रभावी पद्धत असून ती तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली पूर्णपणे नियंत्रित स्वरूपात दिली जाते.
रुग्णाला भूल देऊन ही प्रक्रिया पार पाडली जाते, त्यामुळे उपचारादरम्यान कोणताही त्रास होत नाही. डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील अनुभवी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली या तरुणावर ईसीटीची काही सत्रे घेण्यात आली. उपचारांना रुग्णाने सकारात्मक प्रतिसाद दिला आणि अवघ्या १५ दिवसांत त्याच्या वागणुकीत लक्षणीय बदल दिसू लागले. त्याची चिडचिड कमी झाली, भीती व संशयाचे प्रमाण घटले आणि तो पुन्हा कुटुंबीयांशी संवाद साधू लागला.
सध्या त्याची प्रकृती पूर्वीपेक्षा खूप सुधारली असून तो हळूहळू सामान्य जीवनाकडे परतत आहे. या यशस्वी उपचारामुळे मानसिक आजारांवर आधुनिक वैद्यकीय पद्धतींच्या प्रभावीपणाचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे.
याबाबत बोलताना डॉ. देवांश गणात्रा यांनी सांगितले की, मानसिक आजारांमध्ये योग्य वेळी उपचार घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. अनेकदा समाजातील गैरसमज आणि भीतीमुळे रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांकडून उपचार घेण्यास विलंब होतो. मात्र आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे अनेक मानसिक आजारांवर प्रभावी उपचार शक्य झाले आहेत आणि ईसीटी ही सुरक्षित व परिणामकारक पद्धत म्हणून सिद्ध झाली आहे.



