जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । काश्मिरी येथे इस्लामी अतिरेक्यांनी हिंस्त्र पशुलाही लाजवेल असे मृत्यूचे थैमान माजवत निरपराध लोकांना त्यांचा धर्म विचारत निवडून हिंदूंना गोळ्या घातल्या. या घटनेत अनेक पर्यटक मृत्यूमुखी पडले, या घटनेच्या निषेधार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल हिंदू समाज आणि विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी या आंदोलनात विविध संघटनांनी पाठींबा दिला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून इस्लामी आतंकवादाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. त्यानंतर पाकिस्तान झेंड्याला लाथाळले. यावेळी आंदोलकांनी ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ आणि ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. आंदोलनात शहरातील विविध हिंदू संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
काश्मीरमध्ये इस्लामी अतिरेक्यांनी क्रूर कृत्य करत निरपराध हिंदू लोकांना धर्म विचारून त्यांची हत्या केली. या घटनेत अनेक पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले. या अमानुष कृत्याचा देशभरातून तीव्र निषेध व्यक्त होत आहे.
या मोर्चात आमदार राजूमामा भोळे, माजी उपमहापौर विष्णू भंगाळे, भाजप महिला प्रदेश उपाध्यक्षा डॉ. केतकी पाटील, माजी नगरसेवक कैलास आप्पा सोनवणे यांच्यासह हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.