धरणगाव (प्रतिनिधी) इंग्रजांशी अखेरच्या श्वासापर्यंत लढा देणारे खाज्याजी नाईक यांनी इंग्रजांचा व्यापार उद्वस्त करण्याची कामगिरी केली होती. त्यांचे धरणगावात स्मारक व्हावे ही सगळ्यांची इच्छा होती. त्यानुसार आज या स्मारकाची पायाभरणी होत आहे. गेल्या ५० वर्षात सरकारने जेवढे आदिवासी बांधवांसाठी केले नसेल तेवढे या सरकारने गेल्या साडेचार वर्षात केले आहे. केवळ आश्वासने न देता त्यांच्यासाठी विविध योजना राबवून प्रत्यक्ष काम करून दाखवले आहे. असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. आज ते येथील खाज्याजी नाईक स्मृति संस्थेतर्फे आयोजित भव्य जनजागृती मेळाव्यात बोलत होते.
या कार्यक्रमाला रा.स्व. संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशीही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ते यावेळी म्हणाले की, राज्यात सध्या संवेदनशिल सरकार आहे. सरकारसोबत सामाजिक संघटनांनी उभे राहणे गरजेचे आहे. तसेच प्रत्येक नागरिकांने सामाजिक संघटनांना बाळ देणे गरजेचे आहे. येथील जळगाव रस्त्यावरील रेल्वे स्टेशन समोर हा मेळावा घेण्यात आला. यावेळी रामेश्वर येथील प.पू. नारायणस्वामी हे आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते. याशिवाय मोठ्या प्रमाणावर स्वयंसेवक, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.