
सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील रणगाव येथे नुकताच श्रीमद् भागवत महापुराण कथा सप्ताह व दिंडी सोहळा धार्मिक उत्साहात आणि भक्तिभावाच्या वातावरणात संपन्न झाला. सात दिवस चाललेल्या या धार्मिक सोहळ्यामुळे संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले असून, पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घेतला.

या भागवत कथा सप्ताहासाठी गोजोरे येथील ह. भ. प. शरद बुवा महाराज हे कथावाचक म्हणून लाभले होते. त्यांच्या ओघवत्या वाणीतील कथा, उपदेश आणि भक्तिरसपूर्ण प्रवचनांनी श्रोते मंत्रमुग्ध झाले. संपूर्ण सप्ताहभर विविध मान्यवर महाराजांच्या उपस्थितीत किर्तन, भजन आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामुळे रणगाव परिसरात अध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी रणगाव गावातील मुख्य रस्त्यावरून भव्य दिंडी सोहळा काढण्यात आला. रस्त्यावर आकर्षक रांगोळ्या काढून गाव सजवण्यात आले होते. ढोल-ताशांच्या गजरात, टाळ-मृदंगाच्या नादात आणि “जय हरी विठ्ठल”च्या घोषणांनी दिंडी सोहळा रंगून गेला. थोरगव्हान, सुतगाव, रायपूर, रणगाव, गहुखेडा, तासखेडा, उदळी आदी गावांतील असंख्य भाविकांनी या दिंडीत सहभागी होत कार्यक्रमाचा लाभ घेतला. यानंतर पारंपरिक काल्याचे कीर्तनही भक्तिभावात संपन्न झाले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रणगाव येथे गावकऱ्यांच्या सहकार्याने “नमस्ते सदा वत्सले मातृभूमे” ही प्रार्थना घेऊन आणि “भारत माता की जय”च्या जयघोषाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी भाजपा अनुजाती मोर्चाचे राज्य सचिव प्रा. संजय मोरे, सौ. मायाताई संजय मोरे आणि स्वप्नीक मोरे उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान कथावाचक ह. भ. प. शरद बुवा महाराज यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यात आले. त्यानंतर भजनी मंडळातील भागवत महाराज, एकनाथ महाराज, निलेश महाराज, भागवत चौधरी महाराज, देवेंद्र महाराज, निंभोरा सिम धगन महाराज, दिनकर महाराज, निवृत्ती कोळी महाराज, संजय महाराज पाटील (तासखेडा), त्र्यंबक महाराज तसेच सरपंच संदीप कोळी यांचा रुमाल, टोपी व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक कडू धोंडू चौधरी, भागवत चौधरी, पुंडलिक चौधरी, काशिनाथ चौधरी, पोलीस पाटील बळीराम पाटील, पंडित पाटील, धनराज चौधरी, सोपान चौधरी, भाऊलाल पाटील, लक्ष्मण पाटील, चिंतामण चौधरी, रमेश चौधरी, भागवत कोळी, उत्तम चौधरी, अर्जुन चौधरी, हेमराज कोळी, धनराज कोळी, धनंजय कोळी, बिजलाल पाटील, पुंडलिक पाटील, वासुदेव कोळी, सोपान कोळी, बळीराम चौधरी तसेच बाल टाळकरी यांचा देखील सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमानंतर दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचा लाभ रणगाव व पंचक्रोशीतील भाविकांनी घेतला. रणगाव भजनी मंडळींसह पंचक्रोशीतील भजनी मंडळी, विजय मोरे यांच्यासह अनेक मान्यवर आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



