‘स्व-समाधान शिबिरांमुळे प्रशासन लोकाभिमुख’ – पालकमंत्री गुलाबराव पाटील


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सामान्य जनतेच्या अडचणी तत्काळ सोडवण्यासाठी राज्य शासनातर्फे आयोजित करण्यात येणारी ‘छत्रपती शिवाजी महाराज स्व-समाधान शिबिरे’ हे एक सकारात्मक आणि लोकाभिमुख पाऊल आहे. प्रशासन अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम व्हावे, हाच या उपक्रमाचा खरा उद्देश आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

पाळधी (ता. धरणगाव) येथील शासकीय विश्रामगृहात महसूल विभागाच्या वतीने आयोजित शिबिरात ते बोलत होते. यावेळी विविध शासकीय योजनांचा थेट लाभ लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला. या शिबिरात शेतकरी, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि गरजू नागरिक अशा सर्व स्तरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला, ज्यामुळे प्रशासनाचे जनतेशी थेट संवाद साधण्याचे उद्दिष्ट सफल झाले.

शिबिरातील महत्त्वाचे उपक्रम व लाभ
या शिबिरात एकूण ८८५ शासकीय दाखले (जात, उत्पन्न, शैक्षणिक, नॉन-क्रिमिलेअर) तात्काळ वितरित करण्यात आले. ‘सुलभ शेतकरी योजना’ अंतर्गत तालुक्यातील १३५९ आणि पाळधी मंडळातील २५२ गटांमध्ये ‘तुकडा’ शेरा कमी करून सुधारित सातबारा उतारे शेतकऱ्यांना प्रदान करण्यात आले. तसेच, ‘जिवंत सातबारा मोहिमे’ अंतर्गत ४३७ मयत खातेदारांच्या वारसांची नोंद घेऊन फेरफार दाखले तयार करण्यात आले, ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.

‘संजय गांधी निराधार योजना’ अंतर्गत १६,१७६ लाभार्थ्यांपैकी १४,००० जणांना थेट बँक खात्यात लाभ जमा करण्यात आला असून, उर्वरित लाभार्थ्यांचे कामकाज शिबिरात सुरू आहे. महिला शेतकरी मुक्ताबाई अर्जुन सूर्यवंशी यांना यांत्रिक सहाय्य म्हणून १.२५ लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले. याव्यतिरिक्त, घरकुल योजनेंतर्गत तालुक्यातील ४,७३२ लाभार्थ्यांना मोफत वाळू वाटपाच्या निर्णयानुसार प्रारंभी २० लाभार्थ्यांना वाळू वितरित करण्यात आली, ज्यामुळे त्यांच्या घरकुलांच्या कामाला गती मिळाली.

प्रशासनाचा लोकांशी थेट संवाद आणि उपस्थित मान्यवर
या शिबिरांच्या माध्यमातून प्रशासन थेट जनतेच्या दारी पोहोचले असून, नागरिकांच्या अडचणी तात्काळ मार्गी लावण्यात आल्या. यामुळे प्रशासन आणि जनतेमधील विश्वास अधिक दृढ झाला, असे पालकमंत्र्यांनी नमूद केले.

या वेळी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, सरपंच विजय पाटील, माजी उपसभापती डी. ओ. पाटील, गटविकास अधिकारी अजितसिंग पवार, तालुका कृषी अधिकारी किरण देसले, उपअभियंता एस. डी. पाटील, शेतकी संघाचे संजय महाजन, माजी सरपंच अरुण पाटील, प्रशांत झंवर, आबा माळी, कल्पेश कोळी, महेश शिंपी, समाधान माळी, अनिल माळी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते यांनी केले, तर आभार प्रभारी तहसीलदार संदीप मोरे यांनी मानले. या शिबिरांमुळे सामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यात प्रशासकीय गतिमानता दिसून येत आहे.