नवीदिल्ली, वृत्तसंस्था | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे खासदार अभिषेक मनू संघवी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत “सावरकरांनी स्वातंत्र्य आणि दलितांच्या अधिकारांसाठी मोठा संघर्ष केला आणि देशासाठी ते तुरूंगातही गेले”, असे ट्विट त्यांनी केले आहे. त्यांच्या या ट्विटवरून काँग्रेसचे अनेक नेते हैराण झाले आहेत.
संघवी यांचे ट्विट व्हायरल झाल्यानंतर त्यांना अहमद पटेल यांनी फोन केला असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच मतदानाच्या दिवशी तुम्ही अशा प्रकारचे ट्विट कस करू शकता ? असा सवालही केला असल्याचे म्हटले जात आहे. परंतु संघवी यांच्या मते पटेल यांनी त्यांना फोन करून केवळ त्यांच्या ट्विटचा अर्थ विचारला होता. आपण व्यक्तीगतरित्या सावरकरांच्या विचारांशी सहमत नाही. परंतु त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात दिलेले योगदान महत्त्वपूर्ण असून ते आपण नाकारू शकत नाही. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी लढा दिला. तसेच देशासाठी त्यांनी तुरूंगवासही भोगल्याचे त्यांनी म्हटले होते.
यापूर्वी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनीही स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रशंसा केली होती. आम्ही सावरकरांच्या विरोधात नाही, तर हिंदुत्वाच्या विचारधारेच्या विरोधात असल्याचं ते म्हणाले होते. तसंच तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सावरकरांवरील टपाल तिकिटही काढल्याचा उल्लेख त्यांनी केला होता.