संस्कृती फाउंडेशनतर्फे चोरवडजवळ नदी पुनरुज्जीवनाचा स्तुत्य प्रयत्न

65f3774a 621d 4051 b2cf 7a1ed4054fe4

येथील संस्कृती फाउंडेशनतर्फे चोरवड जवळील नदीपात्रात आज (दि.१२) नदी पुनरुज्जीवन प्रकल्प राबवण्यात आला. यंदा दुष्काळावर मात करून पाणीटंचाईचे संकट निवारण्यासाठी व पावसाचे पाणी जमीनीत जिरविण्यासाठी संस्कृती फाउंडेशनतर्फे शहराच्या जवळपास असलेल्या नद्यांना पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

 

शहराच्या अवती-भोवती असलेल्या नद्यांमध्ये कचऱ्याचे प्रमाण वाढल्याने त्यात खोली राहलेली नाही, तसेच नदीपात्र मातीने पूर्ण भरून गेल्याने नद्यांना रस्त्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे. त्यामुळे नद्यांमधून पावसाळ्यात पाणी वाहणे अवघड होते. अश्या प्रवाह विस्कळीत झालेल्या नद्यांचा प्रवाह सुरळीत होण्यासाठी संस्कृती फाउंडेशनने श्रमदानातून खोलीकरण करणे, त्यातील कचरा तसेच माती काढून त्यात दगड मातीचे बांध बांधणे, अशा कामांना सुरवात केली आहे.
त्यासाठी पहिल्या टप्प्यात सुमारे पाच तास श्रमदान करण्यात आले. संस्कृती संस्थेचे जेष्ठ सदस्य अशोक चौधरी यांच्या हस्ते श्रीफळ फोडून कार्याला सुरवात करण्यात आली. यात पहिल्या टप्यात भुसावळ-जामनेर रोडवरील चोरवड गावाजवळ असलेल्या नदीचे खोलीकरण करण्यात आले. त्यासाठी जेसीबी यंत्रणा शहीद भगतसिंग फाउंडेशनचे अध्यक्ष निलेश रायपूरे ह्यांच्याकडून पुरवण्यात आली होती.

यंदा दुष्काळी परिस्थिती असल्याने जलसंधारणाला प्राधान्य दिले पाहिजे, हा विचार तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी फाउंडेशन ने सोशल नेटवर्किंग साईटची मदत घेतली आहे. जास्तीत जास्त लोकसहभाग वाढावा, ह्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सेवाभावी तत्वावर जेसीबी, ट्रॅक्टरसह यंत्रसामग्री उपलब्ध व्हावी, यासाठी पाठपुरावा सुरू आहे. निसर्गाचे आपण काही देणे लागतो, या भावनेतून हे कार्य संपन्न होणार आहे. आपला सुटीचा दिवस सगळ्यांनी सत्कारणी लावावा आणि जास्तीत जास्त संख्येने संस्थेसोबत श्रमदानासाठी यावे, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. संस्थेतर्फे याच नदीच्या अवती-भोवती पावसाळ्यात वृक्षारोपण करण्यात येणार असून त्यांचे संगोपनही केले जाणार आहे.

Add Comment

Protected Content