राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने पिकविमा जमा करा – रविकांत तुपकर

बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बुलढाणा जिल्ह्यात गेल्या खरीप हंगामातील पिकविमा मंजूर असलेल्या ८५ हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापही पिकविमा जमा झालेला नाही. बुलढाणा जिल्ह्यासह राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने पिकविमा जमा करण्याबाबत पिकविमा कंपन्यांना आदेश द्यावेत,अशी मागणी रविकांत तुपकर यांनी राज्याचे कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्याकडे केली. दि. १२ जून रोजी मुंबई येथे मंत्रालयात तुपकरांनी ना.धनंजय मुंडेंची भेट घेतली. नवीन खरीप हंगाम आला तरी मागील खरीप हंगामाचा पिकविमा शेतकऱ्यांना मिळाला नाही ही मोठी शोकांतिका असल्याचेही तुपकरांनी त्यांना सांगितले.

राज्यात पावसाचे आगमन झाले आहे. पेरणीची लगबग सुरू झाली आहे. परंतु असे असले तरी गतवर्षीचा पात्र शेतकऱ्यांना अद्यापही पिकविम्याची रक्कम मिळालेली नाही. बुलढाणा जिल्ह्यात गेल्या खरीप हंगामातील पिकविमा मंजूर असलेल्या ८५ हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांना पिकविम्याची प्रतीक्षा लागून आहे. बुलढाणा जिल्ह्यासह राज्यातील पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने पिकविमा जमा करण्याचे आदेश पिकविमा कंपन्यांना द्यावेत, अशी मागणी तुपकरांनी ना. मुंडे यांच्याकडे केली आहे.

सध्या राज्यभरातील शेतकरी खते आणि बी-बियाण्यांच्या खरेदीसाठी कृषी केंद्रांवर गर्दी करत आहे. या पार्श्वभूमीवर खते, बी- बियाण्यांचा राज्यामध्ये होणारा तुटवडा, बोगस खतांची विक्री व लिंकिंगच्या माध्यमातून अतिरिक्त खते शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचा प्रकार तातडीने थांबविण्यासंदर्भात कृषी विभागाला सूचना देण्याची मागणी सुद्धा त्यांना केली आहे. त्याचबरोबर गेल्यावर्षी सिंदखेडराजा तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेडनेटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. या शेडनेट उत्पादक शेतकऱ्यांच्या सातबारावर बोजा चढवण्याचा घाट कृषी विभागाने घातला आहे. हा घाट तातडीने थांबवण्यासंदर्भात ही विनंती तुपकरांनी केली. त्यावर ना.धनंजय मुंडे यांनी तातडीने बुलढाणा जिल्हा कृषि अधीक्षकांना शेतकऱ्यांवर होणारी कारवाई थांबवण्याचे आदेश दिले आहे. याप्रसंगी इसरूळचे सरपंच सतीश पाटील-भुतेकर, श्याम पाटील-भुतेकर, भिकणराव भुतेकर व प्रदीप सोळंकी उपस्थित होते.

Protected Content