जळगाव प्रतिनिधी | एरंडोल तालुक्यातील खडका बुद्रुक येथील कर्जबाजारीपणामुळे हतबल झालेल्या एका शेतकऱ्याने १६ ऑगस्ट रोजी विष प्राशन केले होते. त्यांचा आज उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. याबाबत जिल्हापेठ पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रवींद्र भास्कर पाटील (वय 40 रा. खडका बुद्रुक ता.एरंडोल) हे शेत मजुरी व शेती करून आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. सततच्या नापिकीमुळे त्यांना दोन वर्षांपूर्वी मुलीच्या विवाहनिमित्त घेतलेले कर्ज फेडणे शक्य होत नव्हते. शेवटी १६ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास नैराशातून त्यांनी शेतात पीक फवारणी औषध प्राशन केले. यानंतर अत्यवस्थ वाटू लागल्याने त्यांना जळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. परंतू वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना मयत घोषित केले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत रवींद्र पाटील यांच्या पश्चात भाऊ पत्नी दोन मुले असा परिवार आहे.